विशेष प्रतिनिधी
मुंबई : आमदार निवासात काही अनियमितता असेल तर त्याची स्वंतत्र चौकशी केली जाऊ शकते, मात्र लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे मारहाण करणे हे चुकीचे आहे. अशा प्रकारांमुळे जनतेमध्ये आमदारांबद्दल चुकीची भावना जाते. आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल विधानसभा अध्यक्ष आणि सभापती यांनी मिळून या प्रकरणाची दखल घ्यावी तसेच यासंबंधी कारवाई करावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. (It is wrong for a public representative to beat up Chief Ministers statement on Sanjay Gaikwads actions)
शिवसेना (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टिनमध्ये बॉक्सिंग स्टाईलने कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदार बनियन आणि टॉवेलवर येऊन कॅन्टिनमधील कर्मचाऱ्याला मारतो ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्ताधारी पक्षातील आमदारांवर काही वचक आहे की नाही, असा थेट सवाल करत संजय गायकवाड यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे) आमदार अनिल परब यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभागृहात उत्तर देताना म्हणाले की मी त्या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आहे. अशा प्रकारामुळे सर्वच आमदारांची प्रतिष्ठा समाजात कमी होते. आमदार निवासात काही अनियमितता असेल तर त्याची स्वंतत्र चौकशी केली जाऊ शकते, मात्र लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे मारहाण करणे हे चुकीचे आहे. अशा प्रकारांमुळे जनतेमध्ये आमदारांबद्दल चुकीची भावना जाते. आमदार सत्तेचा गैरवापर करतात अशी लोकांची समजूत होते. त्यामुळे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आमदारांबद्दल विधानसभा अध्यक्ष आणि सभापती यांनी मिळून या प्रकरणाची दखल घ्यावी तसेच यासंबंधी कारवाई करावी, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांच्या सुसंस्कृत प्रतिमेला तडे देण्याचे काम सरकारमधील आमदार करत आहेत. फक्त निकृष्ट दर्जाचे जेवण दिले म्हणून कॅन्टिनमधील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करतो. बनियन आणि लुंगीवर कॅन्टिनमध्ये येऊन मारहाण करतो. आमदारांनी कसं राहिलं पाहिजे याचे किमान काही संकेत महाराष्ट्रात आहेत की नाही, असा सवाल अनिल परब यांनी केला. आमदार हे काही गल्लीतील लोक आहेत का? ते टॉवेलवर येऊन कर्मचाऱ्याला मारतात, यांच्यात एवढी हिम्मत आहे तर त्या खात्याच्या मंत्र्यांना मारा. कर्मचाऱ्याला मारहाणीचा व्हिडिओ तयार करुन तो सोशल मीडियावर हे आमदार टाकतात, यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेला तडे जात आहेत, अशा आमदारांचा त्यांनी बंदोबस्त करावा, असे आवाहन अनिल परब यांनी केले.
