ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटीच्या सर्व आगारातून वाहतूक सुरळीत झाल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी एसटी बसला लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यामुळे खबरदारी म्हणून अनेक एसटी फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. आता राज्यभरात शालेय विद्यार्थ्यांच्या सहामाही परीक्षा सुरु असल्याने शालेय फेऱ्यांना एसटीकडून प्राधान्य देण्यात आलंय. येत्या 9 नोव्हेंबरपासून एसटीची दिवाळी जादा वाहतूक सुरु होणार आहे.
उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सरकारला दोन महिन्यांचा अवधी देऊन उपोषण मागे घेतले. यामुळे जालना जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगरमधील इंटरनेट सेवा सुरळीत झाली असून, त्यानंतर आता एसटी बस सेवाही सुरळीत झाली असून, शुक्रवारी सकाळपासूनच सर्व मार्गावर लालपरी धावत असल्याचे दिसून येत आहे. एसटी बस सणासुदीच्या काळात गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर, इंटरनेट सेवा बंद असल्याने खंडित झालेले व्यवहार देखील पुन्हा एकदा सुरू झाले आहे.
अनेक जिल्ह्यांमध्ये बसच्या फेऱ्या रद्द केल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला . दरम्यान लवकरच राज्यातील एसटी बससेवा पूर्वरत होईल, असं महामंडळाकडून सांगण्यात आले. तसेच महामंडळाने गुरूवारी रात्रीपासूनच इतर विभागाच्या अकडून पडलेल्या गाड्या सोडण्यास सुरूवात केली.पुणे आगाराने मराठवाडा, विदर्भात जाणाऱ्या सर्व बस बंद केल्या होत्या. पुण्यातून जाणाऱ्या बसच्या ७८० फेऱ्या रद्द केल्या गेल्या होत्या. दरम्यान आता आंदोलन स्थगित केल्याने बस पुन्हा सुरू होणार आहे.
