विशेष प्रतिनिधी
मुंबई :प्रेमाला धर्माची चौकट घालता येत नाही. दोन वेगवेगळ्या धर्मातील व्यक्तींमध्ये प्रेम होतं, म्हणजे ते लव्ह जिहादचं नाव घेतलं जावं का? असा सवाल प्रसिद्ध अभिनेते आमिर खान याने केला .’आप की अदालत’ या कार्यक्रमात आमिर खानला लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपांबाबत विचारण्यात आले होते. ( Aamir Khan on love jihad allegations said love has no religious ties my sister and daughter are married to Hindus)
आमिर म्हणाला, माझी बहीण निखत हिने संतोष हेगडे या हिंदू तरुणाशी लग्न केलं आहे. फरहतने राजीव दत्तशी लग्न केलं, तोही हिंदू आहे. माझी मुलगी आयराने नुकतंच नुपूर शिखरेशी विवाह केला, तोही हिंदू आहे. मग हे सगळं लव्ह जिहाद म्हणायचं का? प्रेम ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे, ती कोणत्याही धर्माच्या वर असते.
२०१४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पीके’ या चित्रपटावर हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप झाला होता. चित्रपटातील कथानकात हिंदू-मुस्लिम प्रेमकथेचा समावेश असल्याने त्यावर लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. यावर प्रतिक्रिया देताना आमिर म्हणतो, आम्ही कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. ‘पीके’ चित्रपटाचा उद्देश धर्माचा गैरफायदा घेणाऱ्या, भोळ्या लोकांना गंडवणाऱ्या ढोंगी लोकांपासून सावध राहण्याचा होता. अशा लोकांचा प्रत्येक धर्मात शिरकाव असतो.
पत्नी हिंदू असूनही मुलांची नावे मुस्लिम का? यावर आमिर म्हणाला, “माझ्या प्रत्येक मुलाचं नाव माझ्या पत्नीच्या संमतीने ठरलं आहे. माझ्या मुलीचं पूर्ण नाव आयरा सरस्वती खान आहे, जे मेनका गांधी यांच्या हिंदू नावांच्या पुस्तकातून घेतलं आहे. माझ्या मुलाचं नाव आझाद हे मौलाना आझाद यांच्यावरील आदरापोटी ठेवण्यात आलं.”
आमिर खान म्हणाला, माझं कोणत्याही धर्माविरोधात कधीच मत नव्हतं. मी भारताच्या मूल्यांमध्ये, एकतेत आणि सहिष्णुतेमध्ये विश्वास ठेवतो. प्रेम आणि नातेसंबंध हे केवळ धर्माच्या चौकटीत मर्यादित नसतात. समाजाने प्रेमाला धर्माच्या राजकारणात ओढू नये.
