विशेष प्रतिनिधी
मुंबई :वित्तीय संस्थांकडून कर्जदार शेतकरी व व्यावसायिकांकडून होणारी वसुली तात्काळ तहकूब करावी आणि त्यांना दिलासा देण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केली आहे. ( Stop recovery from farmers waive off loansSharad Pawars demand)
राज्यातील अनेक भागांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झाले आहे, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना पवार म्हणाले, राज्य सरकारने आपत्ती निवारणाची महत्त्वाची कामे तातडीने हाती घ्यावीत. नुकसान भरपाईसोबतच पुनरुज्जीवन कार्यक्रमाचा ठोस आराखडा तयार करा. पंचनामा प्रक्रियेत असलेली वेळेची मर्यादा शिथिल करावी. अभूतपूर्व आपत्तीमध्ये पंचनामे वेळेत पूर्ण करणे शक्य नसते. अतिवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊन पडल्यामुळे भिंती-छप्परांना भेगा जाऊन घरे आणि इतर वास्तूंची पडझड होते, तसेच पाणी ओसरल्यावर पिके व पशुधन हानी निदर्शनास येते. अशा नव्याने निदर्शनास आलेल्या नुकसानीचे देखील पंचनामे होऊन आपदग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी.
पिकांच्या पुनर्पेरणी, पुनर्लागवडी आणि फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष मदत द्यावी. जमीन सुधारणा: वाहून गेलेली किंवा नापीक झालेली जमीन सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करावा. सिंचन साधनांची दुरुस्ती: लहान-मोठे बंधारे, सिंचन कालवे, विहिरी, पंपिंग यंत्रणा यांची दुरुस्ती आणि गाळ काढण्याची कामे हाती घ्यावीत. मनरेगाचा वापर: पुनर्बांधणी व पुनरुज्जीवनाची कामे मनरेगा (MNREGA) योजनेतून कशी होतील आणि आपदग्रस्तांच्या हातांना काम कसे मिळेल, याचे नियोजन करावे. पायाभूत सुविधा: शाळा, आरोग्य, वीज, रस्ते या पायाभूत सुविधांच्या पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार करून पावसाळ्यानंतर त्याची अंमलबजावणी तातडीने करावी अशी मागणी पवार यांनी केली.
शरद पवार म्हणाले, पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथिल करावेत आणि खासगी विमा कंपन्यांकडून होणारी टाळाटाळ व दिरंगाई सरकारने थांबवावी. अतिवृष्टीमुळे नष्ट झालेले संसारोपयोगी साहित्य (भांडी, कपडे, फर्निचर), तसेच शालेय साहित्य, चारा व शेतीची साधने यांचा पुरवठा करण्याचे नियोजन करावे आणि ते वेळेत पुरवावे.
शरद पवार यांनी आपत्तीग्रस्तांना मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याची सूचना केली आहे. बाधित व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, याकडे सत्वर लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. त्यांनी जनतेला धीर धरण्याचे आवाहन करताना विश्वास व्यक्त केला की, यापूर्वीही अशा संकटांतून मार्ग काढून आपण उभे राहिलो आहोत, तसे यावेळीही पुन्हा उभे राहू.
