असं म्हटलं जातं कि संसद भवन म्हणजे लोकशाहीचं मंदिर. मात्र या मंदिरात जर कोणी असभ्य आणि असंसदीय व्यवहार केला, तर त्यालाही शिक्षा ही केलीच जाते. तसंच काहीसं नुकतंच घडलं संसदेच्या पावसाळी सत्रादरम्यान राज्यसभेत. शेतीविषयक एक अत्यंत महत्वाचं विधेयक नुकतंच राज्यसभेत मांडण्यात आलं, मात्र विरोधी पक्षातील काही खासदारांनी अतिशय बेजबाबदारपणे वागत या विधेयकाचा विरोध केला, असंसदीय नारे दिले, उप सभापतींवर कागदाचे कपटे फेकले, आणि एकूणच गदारोळ झाला. या नंतर उपसभापतींनी त्या सर्व ८ खासदारांना निलंबित केले. आणि ते ८ ही खासदार उपोषणावर बसले. आज सकाळी उपसभापतींनी आपल्या घरून त्यांच्यासाठी चहा घेऊन जाउन त्यांच्याशी संवाद साधून आपल्या सुसभ्य वागणूकीचे दर्शन त्यांना दिले. मात्र हे सर्व पवार साहेबांना काही पचनी पडले नाही, आणि त्यांना विरोधी पक्षातील खासदारांची भूमिका योग्य वाटल्यामुळे ते स्वत: देखील एक दिवसाच्या उपासावर गेले. पवार साहेबांचं असं उपास करणं, विरोधी पक्षातील खासदारांची बेजबाबदार वागणूक सिद्ध करतं.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आज माध्यमांशी संवाद साधताना म्हटले कि, “पवार साहेबांनी कुठेही विधेयकाला विरोध केलेला नाही, मात्र त्यांनी या सदस्यांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात उपवास घोषित केला आहे. जर ते ८ सदस्य संसदेत अशोभनीय वागले नसते, तर आज पवार साहेबांना हा उपवास घोषित करावा लागला नसता. त्यामुळे एका अर्थी पवार साहेबांचा उपास या सदस्यांच्या अशोभनीय वर्तनाची ग्वाही देतो.” असेही ते म्हणाले आहेत.
त्यांच्या या वक्तव्यात तथ्य आहे. स्वत:ला सदैव शेतकऱ्यांचे कैवारी सांगणारे पवार कुटुंबिय या विधेयकाच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांच्या असभ्य वर्तनावर कारवाई केल्यास त्याचा विरोध करतात, म्हणजे एका अर्थी हा या विधेयकाच्या माध्यमातून मांडण्यात आलेल्या तथ्यांना, आणि महत्वाच्या बाबींना विरोध आहे. संसदेत जे घडलं ते अतिशय अशोभनीय होतं, या सदस्यांची वर्तवणूक लहानमुलांपेक्षाही भयंकर होती, यामुळे उपसभापती हरिवंश नारायण यांना प्रचंड मनस्ताप झाला, याविषयी आज त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र देखील लिहिले आहे. ज्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा देखील केली आहे.
या पत्रातून आणि आज सकाळी त्या ८ खासदारांना चहा पाजून त्यांनी दाखवलेल्या त्यांच्या सुसंस्कृतपणातून आपल्याला एकूण दोन्ही पक्षांमधील फरक दिसून येतो. उपसभापतींचं काम निष्पक्षपणे संसदेचं कामकाज चालवणं असतं. त्यात शेतकऱ्यांसाठी आलेल्या अतिशय महत्वाच्या विधेयकावर चर्चा होत असताना विरोधी पक्ष असू देत किंवा सत्ता पक्ष कुणीही अशी वागणूक केल्यास त्याला शिक्षा ही झालीच पाहीजे. मग त्यात पवार साहेबांना उपसभापतींनी दिलेला निर्णय किंवा केलेली कारवाई चुकीची का वाटते ? असा प्रश्न इथे निर्माण होतो, का त्यांना फक्त आणि फक्त सत्ता पक्षाचा विरोध करायचा आहे, म्हणून त्यांनी उपवास धरला ? असाही प्रश्न उपस्थित होतो.
असो !!! प्रश्न कितीही असूदेत उत्तर एकच आहे, कि संसदीय कामकाज सुरु असताना अशी वागणूक असंसदीय आणि असंस्कृत वाटते, त्यामुळे त्यावर कारवाई ही झालीच पाहीजे. तसेच शरद पवार यांचा उपास त्या ८ खासदारांच्या असभ्य वागणूकीला सिद्ध करतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही !!!
- महाराष्ट्रातील एक सामान्य नागरिक
