विशेष प्रतिनिधी
मुंबई : बीड जिल्ह्यातील दिवंगत संतोष देशमुखांवर अनैतिक संबंधांचा आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याची शंका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे. ( Anjali Damania suspects murder of woman framed to accuse Santosh Deshmukh of having immoral relations)
बीडच्या द्वारका नगरी वसाहतीत 27 मार्चला एका महिलेचा मृतदेह तिच्या घरात सडलेल्या अवस्थेत आढळून आला होता. याबाबत अंजली दमानिया यांनी एक्स या सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना म्हटले की, गूढ संपता संपत नाही आणि हत्या संपता संपत नाहीत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशी झालेल्या महिलेची कळंब शहरात हत्या? संतोष देशमुखावर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कळंब शहरातील द्वारका नगरमध्ये राहत आसलेल्या महिलेची हत्या झाल्याचे कळते आहे. या महिलेची 5 दिवसांपूर्वी हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या की, संबंधित महिलेची कोणत्या कारणाने हत्या झाली? बीड पोलीसांना याबाबत बातमी समजली आणि त्यानंतर ते घटनास्थळी पोहचले. त्यानंतरच तेथील रहिवासींना बातमी कळाली. पण याप्रकरणी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील काही धागेदोरे हाती लागू नये म्हणून ही हत्या झाली की अनैतीक संबधातून हत्या झाली? अशी चर्चा सध्या सुरू आहे. या प्रकरणाचा सखोल तपास पोलीस करत आहेत. असे असले तरी शहर आणि परिसरात या घटनेने दहशत पसरली आहे, असे दमानिया यांनी म्हटले.
शहरातील द्वारका नगरीत राहणाऱ्या लोकांना 2 दिवसांपासून उग्र वास येत होता. पण ज्या घरातून वास येत होता, त्या घराला बाहेरून कुलूप लावलेले होते. दरवाजा तोडून बीड पोलीसांनी आत प्रवेश केल्यानंतर संबंधित महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. मृतदेह सडलेला आसल्यामुळे जागेवरच मृतदेहाचे पोस्टमार्टम केले व अंत्यविधीही उरकला. ही महिला मनीषा आकुसकर आडस, मनीषा बिडवे कळंब, मनीषा मनोज बियाणी कळंब, मनीषा राम उपाडे अंबाजोगाई आणि मनीषा संजय गोंदवले रत्नागिरी अशा नावाने अनेक पुरुषांना अडकवण्याचे काम करायची, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.
