मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून प्रगती नको, राज ठाकरे यांची भूमिका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मराठी माणसाच्या अस्तित्वावर वरवंटा फिरवून जर प्रगती होणार असेल ना तर ती प्रगति आम्हाला नको, अशी रोखठोक भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडली. ( Raj Thackerays stanceProgress should not be made by distorting the existence of Marathi people)

अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या युट्यूब चॅनेलला राज ठाकरे यांनी मुलाखत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज जे फ्लायओव्हर्स, जे ब्रीज वगैरे होत आहेत, ते दिसायला छान दिसतंय, पण यातून जर समजा मराठी माणसाचं अस्तित्व संपणार असेल तर ते आम्हाला नको आहे. आपल्याकडच्या शासनकर्त्यांनी, राज्यकर्त्यांनी पक्षीय मतभेद बाजूला सारून मराठी या विषयाकडे पाहणे खूप आवश्यक आहे. नुसता भाषा दिवस साजरा करणं आणि अभिजाता भाषेचा दर्जा मिळणं याने फक्त मराठी टिकणार नाही.

आपल्याकडे शाळेत शिवाजी महाराज शिकवले जात नाही असे सांगताना राज ठाकरे म्हणाले, मुळात ज्या शाळा आल्या त्या आयएएस अधिकारी आणि त्यांच्या मुलांसाठी सुरू झाल्या. देशभरात त्या शाळा आहेत. पण त्या शाळेत तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवता येत नाही ? ज्यांना आपण क्रांतीचा उगम म्हणतो, त्यांचा इतिहासच तुम्हाला सांगता येत नाही का ? फ्रेंच रिव्होल्यूशन शिकवता तुम्ही, आम्हाला काय चाटायचं ते ? या इतिहासातून आपण बोध काय घेतोय, ते शिकवणं जास्त गरजेचं आहे.