विशेष प्रतिनिधी
मुंबई : अरे मेलेल्यांना कोण मारणार? महाराष्ट्राच्या जनतेने यांचा मुडदा आधीच पाडला आहे, असे उत्तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले आहे. शिवसेना वर्धापन दिनाच्या झालेल्या दोन वेगवेगळ्या मेळाव्यात दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. ( Who will kill the deadEknath Shindes counterattack on Uddhav Thackerays Come on Kill Me challenge)
उध्दव ठाकरेंनी मेळाव्यात आव्हान देताना कम ऑन, किल मी असे म्हटले होते. त्याला एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, नुसताच शोर करून मनगटात जोर येत नाही. वाघाचं कातडं पांघरून लांडग्याला वाघ होता येत नाही. नुसता तोंडाच्या वाफा सोडून उपयोग नाही, मनगटात दम असावा लागतो. आमच्या नादाला लागू नका तुम्ही. तुम्हाला तीन वर्षांपूर्वी दाखवलं आहे. तुमचा आम्ही टांगा पलटी घोडे फरार केले. मी ही बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक आहे हम किसको छेडते नही और हमे जो छेडे उसे छोडते नही.
शिंदे ठाकरेंच्या मेळाव्यावर हल्लाबोल करताना म्हणाले, आज दुसरीकडे कुठेतरी मेळावा सुरू आहे मात्र हा मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. दुसरा सत्तेसाठीच्या लाचारांचा आहे. असली शिवसेना आपली आहे. धनुष्यबाण आणि जनतेचा आशिर्वाद आपल्याकडे आहे.
शिंदे म्हणाले, ५९ वर्षात अनेक आवाहनांना शिवसेनेला सामोरे जावं लागलं. देशात आज बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना फोफावतेय. ७ राज्यातील पदाधिकारी मला भेटले इतर राज्यातील नेतेही शिवसेनेत येऊ इच्छित आहेत. विधानसभेच्या ३ निवडणुकात काय झालं. २८२ जागा लढवल्या ६३ जागा जिंकल्या. २०१९ मध्ये १२४ जागा लढवल्या ५४ जागा जिंकल्या.२०२४ ला ८० जागा लढवल्या ६० जागा जिंकल्या. उबाठाने ९० जागा लढवल्या २० जिंकल्या. आपल्या पक्षाच्या १/३ मतही मिळाली नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना धडा शिकवला. शिवसैनिकानी उबाठाला टाटा बायबाय केलं. आपल्याकडे आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे अहंकार आहे. बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला विरोध केला त्याच्या दावणीला शिवसेनेला बांधल. सत्तेसाठी लाचारी पत्करली. बाळासाहेबांच्या विचाराचा विश्वासघात केला. मराठी माणसाचा हिंदुत्वाचा विश्वास घात केला. सरडाही रंग बदलतो मात्र इतक्या वेगानेही रंग बदलणारा सरडा देशाने पहिल्यांदा बघितला. मुख्यमंत्री पदासाठी झाले लाचार ते काय नेहणार पुढे बाळासाहेबांच विचार. वारसदार म्हणाऱ्यांनी लाचारी पत्करली, बाळासाहेब असते तर वरती टांगून मिरचीची धुरी दिली असती.
