शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा नाही, तर राजकीय विरोध, आमदार राजेश क्षीरसागर यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा नाही, तर राजकीय विरोध असल्याचे दिसून येत आहे.
ज्या ६२ गावांतून महामार्ग जात आहे यातील सर्वाधिक गावांतील शेतकरी शक्तिपीठ महामार्गाचे समर्थन करत आहेत. कोल्हापूरचा विकास होऊ नये, यासाठी काही राजकारणी प्रयत्न करत आहेत. त्यांचा विरोध डावलून लोकांच्या हितासाठी शक्तिपीठ मार्ग होणारच असल्याचा ठाम विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला. ( Shaktipeeth highway is not opposed by farmers but by politicians alleges MLA Rajesh Kshirsagar)

क्षीरसागर म्हणाले, ‘नाशिकपासून शंभर किलोमीटर
असणारे बंदर महामार्गाला जोडले आहे. संपूर्ण महाराष्ट्र या महामार्गाला जोडणार आहे. शेतीला चांगला भाव मिळावा, एवढीच शेतकऱ्यांची भूमिका आहे.आमच्यावर अन्याय होऊ नये, अशीच ते मागणी करत आहेत. पण, सरकारही शेतजमिनीला चांगला दर देणार आहे. शेतकऱ्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. यासाठी शुक्रवारी (दि. 11) मंत्रालयात बैठक होत आहे. या बैठकीसाठी योग्य नियोजन केले जाणार आहे.

शक्तिपीठ महामार्ग होणारच हे ठाम आहे. राज्य आर्थिक अडचणीत आहे, असा चुकीचा प्रसार करत आहेत असा आरोप करून क्षीरसागर म्हणाले,
राज्य कसे चालवावे हे विरोधकांनी आम्हाला सांगू नये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून देश जगात एक नंबरवर नेणार आहोत. देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी महाराष्ट्र सज्ज आहे. २०१४ पूर्वी ज्यांची सत्ता होती, त्यांनी देशासाठी काय केले हे जगाला माहिती आहे. देश खूप मागे राहिला आहे. हा देश पुढे नेण्यासाठी आम्ही तयार आहात. राज्यात आणि देशातील दळणवळणासाठी शक्तिपीठ महामार्ग गरजेचा आहे. तो महामार्ग आम्ही करणार आहोत. विरोधी सरकार असताना त्यांनी काहीही केले नाही. यामुळे राज्य मागे राहिले आहे. विरोधकांना काहीही बोलण्याचा अधिकार नाही.