विशेष प्रतिनिधी
लातूर : वरळी येथे मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यापासून राज्याच्या राजकारणात ठाकरे ब्रँडची चर्चा सुरू झाली आहे. मात्र शिवसेनेचे नेते आमदार संजय गायकवाड यांनी ठाकरे ब्रँडवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ( ( Thackeray brandthen 288 MLAs should have been elected when Balasaheb was alive!)
जर ठाकरे नावाचा ब्रँड असता, तर बाळासाहेब हयात असताना 288 आमदार निवडून आले असते. पण तेव्हाही आपण 70-74 च्या पुढे कधी गेलो नाही, असा टोला संजय गायकवाड यांनी लगावला आहे.
महाराष्ट्र सरकारने हिंदी सक्तीचा जीआर रद्द केल्यानंतर याचा जल्लोष करण्यासाठी वरळी डोम येथे ठाकरे गट आणि मनसे पक्षाकडून विजयोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 20 वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर एकत्र आले होते. शिवसेना ठाकरे गटाच्या ट्विटरवर “ठाकरे ब्रँड” म्हणत उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचा एकत्रित फोटो शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात ठाकरे ब्रँडची चर्चा सुरू झाली आहे
यावर बोलताना ठाकरे ब्रँडवरच गायकवाड यांनी शंका उपस्थित केली. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत ते म्हणाले की, 15 वर्षांपूर्वी एकत्र आले असते, तर काहीतरी परिणाम जाणवला असता. पण उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा विचार सोडून गेले. राज ठाकरे यांनीही टाळीला टाळी द्यायला आता खूप उशीर केला आहे. त्यामुळे मला नाही वाटत की, महाराष्ट्राला याचा फार काही फरक पडेल.
संजय गायकवाड यांना ठाकरे ब्रँडबाबत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, ठाकरे ब्रँड आता राहिलेला नाही. तुम्ही आता लोकांची किती कामं करता, त्यांच्या किती संपर्कात राहता, यावर सगळं अवलंबून आहे. .
