विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या लष्करावरील वक्तव्यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. २००० चौरस किमी जमीन चीनकडून व्यापल्याचा दावा कसा केला? सच्चे भारतीय असाल तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही, अशा शब्दांत सुप्रीम कोर्टानेच राहुल गांधींना सुनावले. ( If you are a true Indian you cannot make such statementsSupreme Court hears Rahul Gandhis allegations regarding China)
भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय लष्कराबाबत केलेल्या कथित वादग्रस्त विधानावरून दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर हे ताशेरे ओढले आहेत.
न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मशी यांच्या खंडपीठाने उत्तर प्रदेश सरकार आणि तक्रारदार उदय शंकर श्रीवास्तव यांना नोटीस बजावून प्रतिसाद मागवला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांच्या विधानांवर गंभीर शंका व्यक्त करत विचारले की, “तुम्हाला कसं कळालं की चीनने २००० चौरस किमी जमीन व्यापली आहे? जर तुम्ही खरे भारतीय असाल, तर अशी वक्तव्यं करूच शकत नाही. कोर्टाने राहुल गांधींना सल्ला दिला की, “तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. तुमचं स्थान संसदीय आहे. मग सोशल मीडियावर अशा संवेदनशील गोष्टी का बोलता?”
तक्रारीत म्हटलं आहे की भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी भारत-चीन सीमावादाच्या संदर्भात भारतीय लष्कराबाबत अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. राहुल गांधींनी याआधी इलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ही तक्रार राजकीय हेतूने प्रेरित आणि चुकीच्या नियतिने दाखल केल्याचा दावा केला होता. मात्र उच्च न्यायालयाने २९ मे रोजी ती याचिका फेटाळली होती. फौजदारी प्रक्रिया स्थगित ठेवून, न्यायालयाने दोन्ही बाजूंकडून प्रतिसाद मागवले आहेत. पुढील सुनावणीसाठी तारीख लवकरच जाहीर होणार आहे.
