विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांनी २९ तारखेला मुंबई येथे माेर्चाची हाक दिली आहे. राज्यभरातून मराठा समाजाला सामील हाेण्याचे आवाहन केले आहे. ऐन गणेशाेत्सवाच्या काळात यामुळे गाेंधळ उडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर गणेशाेत्सवात विघ्न आणू नये, आनंदात खाेडा घालू नये असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे (Chief Minister Devendra Fadnavis appeals not to disrupt Ganeshotsav not to spoil the joy)
मुख्यंमत्री म्हणाले, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा सगळ्यांना अधिकार आहे. त्यामुळे लोकशाही पद्धतीने कुणी आंदोलन करणार असेल तर सरकार कुणाला रोखणार नाही. मात्र गणेशोत्सव हा हिंदुंचा सण आहे. त्यामधे कुणी विघ्न आणू नये. आम्हाला हा विश्वास आहे की आंदोलक या सणाच्या आनंदात खोडा घालणार नाही. कारण आम्ही सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत.
दरम्यान, भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत मुंबईतील मोर्चा पुढे ढकलण्याची विनंती केली आहे. उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणेशाचे आगमन उद्या होत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. महाराष्ट्रातील घराघरात गौरी गणपतीच्या आगमनाने आनंदाचे मांगल्याचे वातावरण आहे. मराठा समाज हा उत्सव मोठ्या भाविकतेने साजरा करतो. नेमक्या अशाच वेळी आरक्षणाचे आंदोलन उभे करून जरांगे मोर्चाने मुंबईत येत आहेत. अवघ्या मुंबईच्या जनजीवनाची घडी विस्कळीत होऊ नये यासाठी त्यांनी मुंबईतील मोर्चा पुढे ढकलावा, हीच त्यांना विनंती आहे, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.
केशव उपाध्ये म्हणाले, उत्सवाचा आनंद संपूर्ण समाजाला विनाव्यत्यय घेता यावा यासाठी मुंबईची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था डोळ्यात तेल घालून काळजी घेत असते. ही व्यवस्था विस्कळीत होऊ नये, यासाठी सगळ्यांचेच सहकार्य गरजेचे आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे यासाठी देवेंद्रजींचे सरकार कटिबद्ध आहे व त्यासाठी प्रयत्नही सुरू आहेत. सरकार मराठा समाजाच्या मागण्यांसाठी प्रामाणिक व सकारात्मक आहे. देवेंद्रजींनी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या आरक्षणाचा श्रीगणेशा केला होता.
मराठा समाजातील तरुणांसाठी अनेक योजना सुरू झाल्या आहेत. उध्दव ठाकरे-शरद पवारांच्या सरकारच्या अपयशाने त्यात विघ्न आले व मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गेले. पण देवेंद्रजी अडचणी दूर करीत मार्ग काढत आहेत. अशावेळी हातात हात घालून, समस्यांचा व अडचणींचा एकत्रितपणे सामना करून सामंजस्याने कोणताही प्रश्न सोडविता यावा यासाठी सरकारसमोर दंड थोपटून उभे राहण्यापेक्षा, सहकार्याचा हात समोर केला तर समाजाचे प्रश्नही सुटतीलच पण सामाजिक सौहार्दही वाढीस लागेल, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे.
