विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेले वक्तव्य हे निवडणुकीपुरते आहे. निवडणुकांच्या वेळी अशी वक्तव्य केली जातात. निवडणुकीनंतर काही तसे वागत नसतात सर्वच शहरांचा विकास करावा लागतो. उद्या मी प्रचाराला गेलो तर मी ही आमच्या उमेदवारासाठी तसेच बोलेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. ( Fadnavis Says Ajit Pawars Remarks Were Only for Election Season)
निवडणूक प्रचार सभेत बोलताना तुमच्याकडे मते तर माझ्याकडे निधी आहे असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. यावरून अजित पवार मतदारांना धमकावत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणून मी एवढेच सांगतो की आम्हाला संपूर्ण भागाचा विकास करायचा आहे. निवडणुकीनंतर सगळ्या शहरांचा विकास आम्हाला करायचा आहे. अनेक वेळा भाषणांमध्ये आपण काही गोष्टी बोलतो त्याचा अर्थ तसा कधीच नसतो. आमचे सहकारी जरी काही बोलले असतील तरी त्यांचा अर्थ तसा नाही ते देखील भेदभाव करणार नाही, असे म्हणत फडणवीसांनी अजित पवारांच्या विधानावर सारवासारव केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात आमच्या महायुतीला जनता निवडून देईल. काही ठिकाणी आम्ही वेगवेगळे लढत असलो तरीही जनता महा युतीच्याच पाठीशी आहे. त्यानंतर आम्ही चांगला विकास करू. हा वेड्याचा बाजार आहे काही माध्यमेदेखील वेडी झाली आहेत, आमच्यामध्ये आणि एकनाथ शिंदेंमध्ये काहीही दुरावा नाही. आम्ही एकमेकांना बोललो नाही असे काही नाही आमच्यात चर्चा झाली न बोलण्यासारखे काहीही घडले नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिकलेल्या तरुणांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग चांगल्या कामांसाठी केला पाहिजे. पण त्यांच्या डोक्यात हे घालणाऱ्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे. तिथे त्याचा जात-धर्म न बघता ठेचून काढावे लागेल. मुस्लिम तरुणांनी अब्दुल कलमांचा आदर्श घ्यावा दुसऱ्यांचा आदर्श घेण्याची गरज नाही.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, दहशतवादी भारताच्या कानाकोपऱ्यात बॉम्बस्फोट घडवू इच्छित होते. मुंबईसह आपल्या देशातील अनेक शहरे त्यांचे लक्ष्य होती. पण जेव्हा आपल्या भारतीय यंत्रणांना याची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी त्यांच्यावर थेट हल्ला केला. यामुळे निराश होऊन दहशतवाद्यांनी दिल्लीत बॉम्बस्फोट घडवून आणले. पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे की दहशतवाद आणि चर्चा एकत्र चालू शकत नाहीत. त्यांनी सशस्त्र दलांना कारवाई करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. ऑपरेशन सिंदूरद्वारे जगाने भारताची ताकद पाहिली.
पंकजा मुंडे यांचे पीए गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली याबद्दल मला संपूर्ण माहिती मिळालेली नाही. प्राथमिक माहिती मला मिळाली आहे. पोलिसांनी संपूर्ण माहिती दिली की याबद्दल बोलता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
