विशेष प्रतिनिधी
मुंबई: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहारावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांवर पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. अजित पवार यांचा फ्रॉड उघड झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ तासांच्या आत अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अन्यथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे तक्रार करू असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे. ( Ajit Pawars fraud exposed if he does not resign within 24 hours complaint to Amit ShahAnjali Damania warns Devendra Fadnavis)
अंजली दमानिया पत्रकार परिषदेत म्हणाल्या, जर २४ तासांत अजित पवारांचा राजीनामा झाला नाही, तर मी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहे. गृहमंत्री म्हणून त्यांनी ना खाऊंगा ना खाने दूंगा असे आश्वासन भारताच्या जनतेला दिले होते, त्यांच्या भेटीची मागणी करते. मी या सर्व गोष्टी जाहीर करते.
दमानिया यांनी अमेडिया (Amadea) कंपनीशी संबंधित जमीन व्यवहारावर लक्ष केंद्रित केले. ज्यात अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची भागीदारी असल्याचा आरोप आहे. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. जोपर्यंत राजीनामा होत नाही, तोपर्यंत आपला लढा सुरू राहिल. अमेडिया कंपनीने जमीन व्यवहारात फसवणूक केली आहे. कंपनीने जमीन विकत घेण्यासाठी अर्ज केला नव्हता, तर कंपनी सुरू करण्यासाठी अर्ज केला होता. डेटा सेंटर सुरू करण्यासाठी त्यांनी पत्रक दिले होते, असा मोठा खुलासा अंजली दमानिया यांनी केला.
शितल तेजवानीसोबत झालेल्या टर्म शीटमध्ये ४० एकर जमीन ५ वर्षांच्या लीजवर डेटा सेंटर आणि आयटी संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अमेडिया कंपनीला देण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहे. जमीन खरेदीसाठी स्टॅम्प ड्युटी माफ नाही, फक्त बिल्डिंगमध्ये सूट मिळते. त्यामुळे ‘LY’ (लेटर ऑफ इंटेंट) हा फ्रॉड आहे. हा सरळ सरळ जमीन ढापण्याचा प्रकार आहे. कंपनी केवळ ९८ लाखांची गुंतवणूक करून डेटा सेंटर सुरू करणार असल्याचे दाखवत आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.
पार्थ पवार यांच्यावर तातडीने एफआयआर (FIR) दाखल करण्यात यावा. कंपनीत त्यांची ९९ टक्के भागीदारी असताना त्यांच्यावर गुन्हा का नाही, असा सवालही अंजली दमानिया यांनी केला. शितल तेजवानी, येवले आणि दिग्विजय पाटील यांना तातडीने ताब्यात घेतले पाहिजे. या गैरव्यवहाराची सर्व कागदपत्रे आणि पुरावे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात दिली आहेत. जर अजित पवारांनी राजीनामा दिला नाही, तर गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
