विकासाला मानवी रुप देत मानवी जीवनात परिवर्तन घडवून आणण्याचे आणि देशातील युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी कौशल्य विषयक प्रशिक्षण देण्याचे कार्य उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांनी करावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
‘वाय4डी’ फाउंडेशन मार्फत आयोजित इंडियाज मोमेंट कॉन्क्लेवमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी ‘वाय4डी’ फाउंडेशन’ चे अध्यक्ष प्रफुल्ल निकम, हिंदुस्तान कोको कोला बिवरेजेसचे उपाध्यक्ष हिमांशू प्रियदर्शनी, ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू पद्मश्री योगेश्वर दत्त, ‘वाय4डी’चे सह सचिव अभिषेक तिवारी, बजाज फिन्सर्व्हचे अध्यक्ष कुरुश इराणी आदी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशातील युवा शक्ती अनेक मोठे बदल घेऊन येत आहे. स्टार्टअप्सध्ये ६० टक्के युवक लहान शहरातून येत आहेत. या स्टार्टअप्समुळे जनतेच्या जीवनातही बदल होत आहे. रोजगार मागण्याऐवजी रोजगार देण्यावर या युवकांचा भर आहे. देशातील सर्वात जास्त नोंदणीकृत स्टार्टअप्स, युनिकॉर्न्स महाराष्ट्रात आहेत. या युवकांची प्रगती पाहता महाराष्ट्रला ट्रिलीअन डॉलर इकॉनॉमी करण्याचे स्वप्न पूर्ण होईल असा विश्वास वाटतो.
कौशल्याला महत्व असलेल्या युगात आपण प्रवेश केला आहे. शिक्षणापेक्षा आज कौशल्याला अधिक महत्व देण्यात येत आहे. युवकांमध्ये चांगले काम करण्याची क्षमता आहे, श्रम करण्याची त्यांची तयारी आहे. त्यांना कौशल्य मिळाल्यास त्यांना रोजगाराच्या संधी मिळू शकतील. त्यामुळे उपयोजित ज्ञानावर अधिक भर द्यावा लागेल. उद्योग आणि स्वयंसेवी संस्था यांनी युवाशक्तीला कौशल्याचे ज्ञान देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले. उद्योगजगत कौशल्य विकासासाठी सहकार्यासाठी पुढे येत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
आपली अर्थव्यव्यवस्था कृषीप्रधान असताना ४० टक्के स्टार्टअप्स कृषी क्षेत्रातील आहेत. मात्र शेती क्षेत्रात कौशल्याची मर्यादा जाणवते. त्यामुळे या क्षेत्राला गती देण्यासाठी आधुनिकता आणून शेतकऱ्यालाही कौशल्य द्यावे लागेल. महाराष्ट्रात जागतिक बँकेच्या माध्यमातून सुमारे १० हजार गावात कृषी उद्योग संस्था तयार करण्यात येत आहे. शेतकऱ्यांचा बाजार शेतकऱ्यांच्या हातात देण्याची व्यवस्था तयार करण्यात येत आहेत. उद्योग आणि स्वयंसेवी संस्थांची यात महत्वाची भूमिका आहे. त्यांनी शासनाच्या योजनेसोबत अशा क्षेत्रात तंत्रज्ञानाची कमतरता भरून काढावी. यातून मोठे परिवर्तन शक्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मागील १० वर्षात देशाने महत्वाची प्रगती केली आहे. भारताच्या चांद्रयान मोहिमेची जगात चर्चा आहे. आर्थिक प्रगतीसाठी देशात अनेक निर्णय घेण्यात आले. प्रगतीला आवश्यक ‘वन नेशन वन टॅक्स’ सारखी व्यवस्था उभी राहिली आहे. डीजीटल व्यवस्थेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभी करून डिजीटल व्यवहारात अमेरिका आणि चीनलाही आपण मागे टाकले आहे. २०३० पर्यंत जगातील तीसरी मोठी अर्थव्यवस्था आपण होणार आहोत, असेही ते म्हणाले.
भारत ही लोकशाही व्यवस्था, कायद्याचे राज्य आणि उद्योगाला अनुकूलता असल्याने अनेक उद्योग देशाकडे आकर्षित होत आहेत. एका बाजूला देशाची अशी प्रगती होत असतांना आपली जबाबदारी वाढली आहे. अशा अर्थव्यवस्थेलास अनुरूप कुशल मनुष्यबळ तयार करणे ही आपली जबाबदारी आहे. देशातील उद्योग या गोष्टीकडे लक्ष देत आहेत ही समाधानाची बाब आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
