परकीय थेट गुंतवणुकीसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची शिष्टाई ठरली मोलाची – उद्योगमंत्री उदय सामंत

परकीय थेट गुंतवणूक महाराष्ट्रात अधिक प्रमाणात यावी यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध उद्योग समुहांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे. डाहोस येथे झालेल्या परिषदेत त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनावर भर दिल्याने आम्हाला मोठ्या प्रमाणात उद्योजकांचा विश्वास संपादन करता आला, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. उद्योग विभागाचे प्रगती पुस्तक राज्यातील उद्योजकांनी समृद्ध केले असून आमच्याप्रती त्यांनी दाखविलेला विश्वास हाच आम्हाला गतीने कामे करण्यासाठी प्रेरणादायी आहे. बुटीबोरी येथे उभारल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी 88 एकर जागा गरजेची होती. ही जागा अवघ्या 48 तासात सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करुन उद्योग विभागाने दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विदर्भासाठी या प्रकल्पातून एक नवी रुजूवात होत आहे. इथल्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. शाश्वत विकासासह सामाजिक उत्तरदायित्वाचे भान जपून आम्ही शेतकऱ्यांना बार्ली लागवड व इतर तंत्रज्ञानाकडे वळवू असे पेर्नोड रिकार्ड इंडियाचे सीईओ जीन टुबूल यांनी आपल्या मनोगतात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी केले.