पीएम किसान सन्मान योजने’त घुसखाेरी करणाऱ्या १८१ बांग्लादेशींवर गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

नाशिक : बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांनी सरकारच्या ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते. यानंतर थेट ‘पीएम किसान सन्मान योजने’त बांगलादेशी घुसखोर लाभार्थी असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी यासदंर्भात आकडेवारी समोर आणत दावा केला होता. नाशिक जिल्ह्यातील १८१ बांग्लादेशींनी ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ योजनेचा लाभ घेतल्याची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुढे आणली होती. या बांग्लादेशींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Case registered against 181 Bangladeshis for infiltrating PM Kisan Samman Yojana)

नाशिक येथील कळवण तालुक्यातील भादवण गावातील १८१ बांग्लादेशींनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ घेतला. त्यांनी आपण भादवण गावचे रहिवाशी असल्याचे दाखवत लाभ घेतला होता. दरम्यान, त्यांच्याविरोधात भारतीय दंड संहिता कलम ४१७, ४६५, ४६८ आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० कलम ६६ (D) अंतर्गत किरीट सोमय्या यांनी कळवण पोलिस ठाण्यात दिनांक ७ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती.

सुक्तारा खातुन, नजमुल हक, तस्लीमा खातुन, इंताब, मोहंमद हजरत, मोहम्मद रशिद आलम, अनिसा, अन्वरा, साहुद राजा, सलाम अली, अफीफा खातुन, इशरत जहाँ, जुलेखा बीबी, अख्तर हुसैन, मोहम्मद हनिफ, खुशबू, मोहम्मद मंजरुल आलम, ताहेर आलम, सरीना खातुन यांच्यासह अनेक जणांचा आरोपींमध्ये समावेश आहे.

राज्यासह देशात बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला आहे. पोलिसांकडून याविरोधात कारवाई सुरू असून घुसखोर नागरिकांना शोधून कारवाई केली जात आहे. हिंदुत्ववादी संघटनाही आवाज उठवत या समस्येला वाचा फोडत आहेत. आतापर्यंत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर आढळून आले आहेत. इतकेच नव्हे तर हे घुसखोर बनावट कागदपत्रांच्या मदतीने थेट सरकारी योजनांचा लाभ घेत असल्याची प्रकरणेही समोर आली होती.