विशेष प्रतिनिधी
मुंबई : खासदार प्रियांका चतुर्वेदी यांच्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना ठाकरे गटाकडून वातावरण तापले जात असताना आधी आपल्या खासदाराला मराठी शिकवा, मग मराठीचा पुळका आणा,” असा टोला शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी लगावला आहे.
( First teach your MP Marathi then bring a bit of Marathi Uddhav Thackeray is in trouble once again because of Priyanka Chaturvedi)
गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाषेवरून वातावरण पेटले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मराठी बोलत नाही म्हणून एका व्यापाऱ्याला मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. शिवसेना ठाकरे गटही मराठीच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेत आहे. मात्र ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचे हिंदीमध्ये संभाषण करतानाचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. त्यांना मराठी बोलता येत नाही हे स्पष्ट केले जात आहे. यावरूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर म्हस्के यांनी निशाणा साधला आहे.
प्रियांका चतुर्वेदी ह्या काँग्रेसमध्ये होत्या. शिवसेनेत प्रवेश केल्यावर त्यांना खासदारकी बहाल करण्यात आली. शिवसेनेने आतापर्यंत अनेक अमराठी व्यक्तींना खासदारकी वाटल्याचा मुद्दाही त्यावेळी चर्चेत आला होता.
नरेश म्हस्के नी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाषण केले आणि त्यांच्या बोलण्यात पराभवाची छाया स्पष्ट दिसत होती. राज ठाकरे यांनी आमच्याबद्दल काहीही म्हटले नाही, म्हणून आम्हीही त्यांच्यावर काही बोलणार नाही. पण उद्धव ठाकरे यांनी अतिशय खालच्या पातळीवर भाषण केल्याचा आरोप करत, त्यांनी उसने अवसान आणले.
नरेश म्हस्के म्हणाले, संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे वाटोळे केले आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादीसोबत नेऊन काय वाटोळे केले हे सर्वांना माहीत आहे. आता त्यांना कॉंग्रेससोबत राहायचे आहे का? आणि कॉंग्रेसला यांच्यासोबत राहायचे आहे का? असा सवाल म्हस्के यांनी केला आहे.
मी दोन महिन्यांपूर्वी आधीच सांगितले होते की शिल्लक सेनेत कोणीही राहणार नाही. परवा झालेल्या मेळाव्यात किती आमदार, खासदार होते याचे उत्तर त्यांनी द्यावे. शिवसेनेत एक आदेश असतो तरी सुद्धा कोणी उपस्थित नव्हते. उद्धव ठाकरे हे हारलेले माणूस आहेत, उद्या रस्त्यावर जरी ते शिव्या देत फिरले तरी आश्चर्य वाटायला नको, असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.
नरेश म्हस्के म्हणाले, एकनाथ शिंदे काय आहे, त्यांची ताकद काय, त्यांच्या मागचा जनाधार त्यांनी दाखवून दिला आहे. मोठा जनाधार मिळाला आहे. निशिकांत दुबे संदर्भातील वक्तव्य मी ऐकलेलं नाही पण जर ते अशा पद्धतीच वक्तव्य करत असतील तर याचा मी निषेध करतो असे म्हस्के म्हणाले. निशिकांत दुबे यांनी हे आधी स्पष्ट करावे की त्यांना बिहार सोडून झारखंडला का जावे लागले. बिहारचे असून देखील झारखंडला का जावे लागले हे आधी सिद्ध करावे त्यानंतर मराठी माणसाबद्दल बोलावे असे म्हस्के म्हणाले.
