ओसाड माळावरच्या जहागिरीला कोणी तयार होईना … म्हणून सपकाळ याना बसविले घोड्यावर

विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद म्हणजे जणू ओसाड माळावरची जहागिरी असे आता त्याच पक्षाच्या नेत्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे सतेज पाटील, अमित देशमुख,  विश्वजित कदम यांच्यापासून ते यशोमती ठाकूर यांच्यापर्यंत पहिल्या फळीतील कोणीही नेता हे पद स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे शेवटी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ याना घोड्यावर बसविण्यात आले आहे. ( The leaders of the  party now feel that the post of state president of the Congress is like a job on a barren field.)
विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभव झाल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेला राजीनामा अखेर स्वीकारण्यात आला आहे.  नवा प्रदेशाध्यक्ष कोण ? याबाबत काँग्रेस वर्तुळात चर्चा सुरू होती.  पश्चिम महाराष्ट्राती सतेज  पाटील, विश्वजीत कदम मराठवाड्यातील  आणि माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांना प्रदेशाध्यक्ष होण्याची गळ घातली जात होती. मात्र या नेत्यांना त्यांची स्वतःची संस्थाने सांभाळायची असल्याने त्यांनी नकार दिला.  विदर्भातून विजय वडेट्टीवार हे इच्छुक होते.मात्र त्यांच्या पक्षनिष्ठेवर श्रेष्ठींना विश्वास नसल्याने ते नाव मागे पडले होते. माजी मंत्री यशोमती ठाकूर  यांनीही निवडणुकीतील पराभवामुळे पद  नकार दिला.  त्यामुळे विदर्भातील चर्चेत नसलेले हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव पुढे आले. त्याच्या नावावर एकमत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
म्हणायला  हर्षवर्धन सपकाळ सध्या काँग्रेसच्या राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष  असले तरी त्यांना महाराष्ट्रातही कोणी फार ओळखत नाही.  सपकाळ यांना सर्वोदय विचारांवर आधारित राष्ट्रनिर्माण युवक शिबिराचे आयोजन, ग्राम स्वच्छता अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीत सक्रिय सहभागाचा अनुभव आहे. २०१४ ते २०१९ या दरम्यान ते बुलढाण्याचे आमदार होते. त्यांनी या काळात जलसंधारण व्यवस्थापनाचा प्रकल्प मतदारसंघात राबवला होता.
हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी तळागाळातून पुढे आली आहे. १९९९ ते २००२ या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचा त्यावेळी लौकिक होता. २०१४ ते २०१९ या दरम्यान ते काँग्रेसचेआमदारही होते.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती केली जात असल्याने या निवडणुका जिंकण्याचे मोठे आव्हान नव्या अध्यक्षांपुढे असणार आहे