विशेष प्रतिनिधी
पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि आरपीआय यांनी महायुती म्हणून एकत्रित लढवाव्या, अशी पक्षाची भूमिका असल्याचे मत आरपीआय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.महायुतीमधील सर्व घटक पक्षांच्या प्रमुखांना भेटून आपण ही भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ( Fight local government elections as a Mahayuti Ramdas Athavale will meet all constituent parties and present their role)
आठवले म्हणाले, पुणे महापालिका निवडणुकीत किमान १५ प्रभागात पक्षाला उमेदवारी मिळावी, संपूर्ण पाच वर्षासाठी उपमहापौर पद मिळावे. मागास प्रवर्गाचे आरक्षण आल्यास महापौर पद मिळावे, अशा प्रमुख मागण्या असल्याचे सांगीतले. त्यासंबंधी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी चर्चा झाली असून योग्य प्रतिसाद मिळेल, अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली
.भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभ परिसराच्या विकासासाठी शंभर ते दीडशे एकर जागा ताब्यात घेऊन जिल्हाधिकारी व सामाजिक न्याय विभागाने प्रस्ताव सादर करावा. त्यासाठी निधी मिळवून देण्यासाठी मदत करू, अशी ग्वाही आठवले यांनी दिली.
यावेळी ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल भारतीय सैन्याचे अभिनंदन व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आरपीआयच्या वतीने राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी ‘भारत जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद’ रॅली काढण्यात येणार असल्याचे सांगितले
संजय राऊत यांना कोपरखळी’नरकात स्वर्ग’ निर्माण करणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी स्वर्गात जायचे की नरकात हे आधी ठरवावे. एकाच वेळी दोन्ही ठिकाणी जाता येणार नाही, अशी कोपरखळी आठवले यांनी मारली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनाम्याची मागणी हास्यास्पद आहे. त्यांना तसा अधिकार नाही. त्या ऐवजी त्यांनी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करावी, अशा शब्दात खिल्ली उडवली.
