विशेष प्रतिनिधी
मुंबई : ‘हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा म्हणजे भारताच्या हिंदू आणि संत परंपरेचा घोर अपमान असून, अशा संज्ञा केवळ मतांसाठी वापरणं अत्यंत निंदनीय आहे, असा आरोप भाजप मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून तीव्र शब्दांत टीका केली असून, पवार गटाची हीच भूमिका आहे का? शरद पवार व सुप्रिया सुळे यांनीही यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. ( The language of Hindu terrorism is an insult to Hindu religion Nitesh Ranes attack on Jitendra Awhad Pawar group demands clarification of position)
राणे यांनी म्हटले आहे की, हिंदू दहशतवाद’ किंवा ‘सनातनी दहशतवाद’ ही भाषा भारताच्या हिंदू आणि संत परंपरेला बदनाम करण्यासाठी तयार केलेली व्याख्या आहे. आधी सुशीलकुमार शिंदे मग पृथ्वीराज चव्हाण आणि आता जितेंद्र आव्हाड ती भाषा वापरत आहेत आणि हिंदू धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याशी शरद पवार साहेब आणि सुप्रियाताई सुळे सहमत आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचीही भूमिका हीच आहे का? हे त्यांनी स्पष्ट करावं. खोट्या धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली केवळ हिंदू धर्म आणि संत परंपरेचा अपमान करायचा हाच आव्हाडांचा अजेंडा असतो. दहशतवाद हा हिंसेशी जोडलेला असतो, जिचा उद्देश लोकशाही, सहिष्णुता आणि समाजविरोधी कट रचणं असतो. सनातन हिंदू परंपरेचा इतिहास हा प्रश्नौत्तरं, संवाद, वैचारिक संघर्ष आणि लोकशाहीचं दर्शन आहे.
नितेश राणे यांनी आव्हाड यांना उद्देशून म्हणाले, “तुमच्या बाटग्या विचारांना हिंदू समाजाने कधीच पाठिंबा दिला नाही, आणि भविष्यातही देणार नाही. केवळ तुमचा एक मतदारसंघ सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्राचं सामाजिक विघटन करू नका.”
यापूर्वी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सनातनी दहशतवाद मान्य करावाच लागेल ! सनातनी दहशतवादाचे अस्तित्व आजचे नाही; तर, ते प्राचीन काळापासून आहे. भगवान बुद्धाला छळणारे हे सनातनी दहशतवादीच होते. बौद्ध भिक्खूंना मारणारे तत्कालीन सनातनी दहशतवादीच होते. चार्वाकाला मारणारे सनातनी दहशतवादीच होते. बसवेश्वरांना मारणारे सनातनी दहशतवादीच होते. संत ज्ञानेश्वरांना छळणारे सनातनी दहशतवादीच होते. संत तुकारामांचा छळ करून त्यांच्या गाथा बुडवणारे सनातनी दहशतवादीच होते. छत्रपती शिवाजी महाराज यांना राज्याभिषेक नाकारणारे, तुम्हाला राजे म्हणवून घेण्याचा अधिकारच नाही, असे म्हणत त्यांची हेटाळणी करणारे सनातनी दहशतवादीच होते.शत्रूशी हातमिळवणी करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या हत्येचा कट रचणारे सनातनी दहशतवादीच होते. त्यांना शत्रूच्या हातात पकडून देणारेही सनातनी दहशतवादीच होते. महात्मा फुलेंवर सामाजिक बहिष्कार टाकून त्यांच्या खुनाची सुपारी देऊन मारेकरी घालणारे सनातनी दहशतवादीच होते. स्त्रियांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरणा देणाऱ्या आद्यशिक्षिका सावित्रीमाई फुले यांच्यावर शेणगोटे मारणारे सनातनी दहशतवादीच होते. छत्रपती शाहू महाराजांना बदनाम करणारे , त्यांच्या खुनाचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते. एका वर्गाला शूद्र ठरवून त्यांना मंदिरात जाण्यापासून रोखणारे सनातनी दहशतवादीच होते. माणसाला माणूस म्हणून जगूच द्यायचे नाही; शूद्रांना पाण्यापासून वंचित ठेवणारे सनातनी दहशतवादीच होते. आगरकर हे केवळ सनातनी प्रवृत्तीविरोधात होते म्हणून त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मारण्याचा प्रयत्न करणारे सनातनी दहशतवादीच होते.
जोपर्यंत जातीव्यवस्था – वर्णव्यवस्था आहे, तोपर्यंत सनातनी दहशतवाद विसरताच येणार नाही, असे सांगतअंधश्रद्धा नष्ट करण्यासाठी झगडणारे नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करणारे सनातनी दहशतवादीच होते. सामाजिक समतेसाठी लढणाऱ्या गोविंद पानसरे यांचा खून करणारे सनातनी दहशतवादीच होते. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या समाजसुधारणेच्या कार्याला संपविण्यासाठी त्यांना ठार मारणारे सनातनी दहशतवादीच होते. स्त्रियांना या समाजात स्थानच नाही. त्या केवळ उपभोगाच्या वस्तू आहेत, असे मानणारे सनातनी दहशतवादीच होते. आपली आई उपभोगण्याची वस्तू आहे, असे मानणारे सनातनी दहशतवादीच होते. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान ज्या सनातनी दहशतवादाविरोधात होते, त्या मनुस्मृतीला आपले संविधान मानणारे सनातनी दहशतवादीच होते. या सनातनी दहशतवादानेच भारताला जातीव्यवस्थेत ढकलले अन् सनातन्यांनीच देशात विषमतावादी वर्णव्यवस्था लादली. अशांना सनातनी दहशतवादी म्हणायचे नाही तर काय म्हणायचे? ‘सनातनी दहशतवाद’ हा शब्द मागील हजारो वर्ष अस्तित्वात होता अन् पुढील हजारो वर्ष अस्तित्वात राहिल, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.
