पन्हाळगड पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला, मुख्यमंत्र्यांची घोषणा

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर :   छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला असेल. जागतिक वारसास्थळ म्हणूनही पहिला किल्ला अशी ओळख निर्माण करेल़ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासाठी राज्य शासनाच्या वतीने निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. (Panhalgad is the first reconstructed fort of Chatrapti  Shivaji Maharaj  era, Chief Minister’s announcement)

किल्ले पन्हाळगड येथे आयोजित ‘विजयोत्सव’ कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  बोलत होते.  ६ मार्च १६७३ रोजी कोंडाजी फर्जंद यांनी आदिलशहाकडून पन्हाळगड जिंकून घेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात सामील केला होता. मुख्यमंत्र्यांनी त्या विजयोत्सवाचे औचित्य साधून या किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या ’13D थिएटर’चे लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पन्हाळगडचा रणसंग्राम’ हा लघुपट पाहिला.

मुख्यमंत्री  म्हणाले, “परकीय आक्रमकांमुळे काळरात्र आलेली असताना राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवले. त्यातूनच छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करत स्वराज्य स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत, छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्यापैकी कोणीच इथे दिसले नसते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज आमचे आराध्य दैवत आहेत. छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराराणी आणि त्यानंतरच्या जाज्ज्वल्य इतिहासात मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले, हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेज होत”.

जोतिबाचा डोंगर विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्याला मान्यता दिली आहे, त्यासाठीचे प्राधिकरण येत्या १५ दिवसांत स्थापन करणार असल्याचे मुख्यमंत्री   फडणवीस यांनी सांगितले . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे १२ किल्ले जागतिक वारसास्थळ म्हणून नॉमिनेट केले असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा जागतिक वारसा होण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पन्हाळगडावर अतिशय सुंदर अशा प्रकारच्या १३ डी शोचे उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली.  इतिहासामध्ये पन्हाळगडचे महत्त्व वेगळे आहे. पन्हाळगडचा इतिहास या १३ डी च्या माध्यमातून जगता येणार आहे. यातील महत्त्वाच्या प्रसंगातून युद्धाच्या रणभूमीवर आपण आहोत अशा प्रकारचा अनुभव मिळतो. शिवकालीन इतिहास केवळ वाचण्यापुरता नाही तर तो जगण्याकरताही आहे. ज्या तज्ज्ञांनी हे काम केलं त्यांचे आभार मुख्यमंत्र्यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *