ठाकरे-पवार ब्रँड’ संपवण्याचा प्रयत्न सुरू, पण तो कधीच संपणार नाही, राज ठाकरे यांचा ठाम विश्वास

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे आणि पवार हे दोन ब्रँड संपवण्याचा प्रयत्न चाललाय, यात काही शंका नाही. पण तो कधीच पूर्णपणे संपणार नाही, हे मी लिहून देतो,” असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले. ( Efforts are underway to end the Thackeray-Pawar brand but it will never end Raj Thackeray firmly believes)

मुंबई तक या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात घेतलेल्या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले, “राजकारणात आडनाव हे केवळ एक नाव नसतं, ते एक ओळख असतं. आमचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्रावर प्रथम प्रभाव टाकला. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे, आणि संगीतासारख्या क्षेत्रात श्रीकांत ठाकरे यांचाही मोठा वाटा होता. त्यानंतर मी, उद्धव ठाकरे आम्ही आलो. म्हणजे ब्रँड ही संकल्पना व्यक्तीपरत्वे बदलत असली तरी ठाकरे नावाचं महत्त्व कायम आहे.
पवार घराण्याचा उल्लेख करताना ते म्हणाले, “शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणात अढळ स्थान आहे. त्यांच्या कारकिर्दीचा प्रभाव मोठा आहे. या दोन्ही आडनावांचा राजकीय ठसा इतका खोल आहे की तो सहज पुसता येणार नाही.”

राज ठाकरे यांनी नुकत्याच आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणावरही स्पष्ट भूमिका मांडली. “सरकारने धोरण मागे घेतलं असलं तरी मी याला संमती देणार नाही. इतर भाषांची पुस्तकं मराठी शाळांपर्यंत पोहोचू देणार नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. भारतात अशी कोणतीही घटना घडलेली नाही की हिंदीला अधिकृत राष्ट्रभाषेचा दर्जा दिला गेला. मराठी ही राज्याची राजभाषा आहे, तर जागतिक स्तरावर इंग्रजी महत्त्वाची आहे. ज्याला हिंदी शिकायची आहे त्याने जरूर शिकावी, पण ती लादू नये.”

राज ठाकरे यांनी काश्मीरमधील हल्ल्यांबाबत दावा करत सांगितले की, “माझा अंदाज होता की काहीतरी मोठं घडेल. मी हे अनेकांशी शेअरही केलं होतं. हे ऐकून कोणाचा विश्वास बसणार नाही, पण मी हे आधीच भाकीत केलं होतं की पर्यटकांना लक्ष्य केलं जाईल.”l मी ज्योतिषी नाही. पण परिस्थिती पाहून, संपर्कातून, मी काही धोके ओळखले होते. अनेक लोकं आहेत ज्यांना भेटून तुम्ही हे साक्षीदार म्हणून ऐकू शकता. मी जाहीरपणे बोललो नव्हतो कारण मला कोणतीही हिंट द्यायची नव्हती.