विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि आपले चुलत बंधू राज ठाकरे यांना पुन्हा एकत्र येण्याचे साद घातली आहे. मात्र या विधानाने शिवसेनेतील जुन्या घडामोडींना आणि संघर्षांना उजाळा मिळाला असून, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राणेंनी ट्विट करून म्हटले आहे की , उद्धव ठाकरे सन्माननीय राज जी ठाकरे यांना भाऊबंदकी या नात्याने परत या असे म्हणून प्रयत्न करीत आहेत. मला आठवते याच उद्धव ठाकरेंनी राज जी ठाकरे यांना छळले होते, त्रासही दिला होता, पक्षाबाहेर जायला यांनीच प्रवृत्त केले होते. त्याची यांना जाणीव नाही वाटतं ? आणि आता का म्हणून लाळ ओकताहेत? (You Harassed Him Then Why Drooling Before Raj Thackeray Now — Narayan Rane Questions Uddhav Thackeray)
गेलेले परत मिळवण्याची धमक व क्षमता उद्धव ठाकरे मध्ये नाही ! जो बूंद से गई वो हौद से नहीं आती ! असे म्हणत नारायण राणे यांनी म्हटले आहे की, सन्माननीय राज जी, नारायण राणे, गणेश नाईक, एकनाथ शिंदे यांनी शिवसेना वाढीसाठी आयुष्य दिले त्यांना बाहेरचा रस्ता दाखवून दिला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसविले याने सत्ता घालविली. शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहे. मराठी माणसाने व हिंदूंनी याला घरी बसविले.
राज ठाकरे यांना २००५ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडावे लागले तेव्हा पक्षात त्यांच्यावर अन्याय झाल्याचे अनेकदा चर्चिले गेले. त्यावेळेस उद्धव ठाकरेंनीच पक्षात त्यांना डावलल्याचा आरोप करण्यात आला होता. हेच नारायण राणे, एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्या बाबतीतही घडले. “सत्ता दिली बाळासाहेबांनी, पण सत्तेची वाट लावली उद्धव ठाकरेंनी,” असे मत आता शिवसेनेच्या माजी नेत्यांकडूनउघडपणे व्यक्त केले जात आहे
उद्धव ठाकरेंनी एका मुलाखतीत राज ठाकरे यांच्याशी पुन्हा एकत्र येण्याची तयारी दर्शवली. पण याला अनेक राजकीय नेते ‘राजकीय स्वार्थ’ म्हणून पाहत आहेत. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर एकत्र येण्याचे प्रयत्न हे केवळ टिकाव धरण्याचे राजकारण आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. राजकीय कार्यकर्ते आणि सामान्य जनतेनेही यावर प्रतिक्रिया देताना “जेव्हा शिवसेना संपवायला निघाले होते तेव्हा कुठे होते हे प्रेम?” असे प्रश्न उपस्थित केले आहेत.
पहिलीपासून हिंदी सक्तीच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गट आणि मनसेतर्फे आवाज उठवत या निर्णयाचा जोरदार विरोध करण्यात आला. त्यासंदर्भात 5 जुलैला मोर्चाचेही आयोजन करण्यात आले होते. अखेर सरकारने यासंदर्भातील 2 जीआर रद्द केल्याची घोषणा केली आणि मराठी माणूस, मराठी अस्मितेचा विजय झाल्याची प्रतिक्रिया ठाकरे बंधूंनी दिली. गेल्या काही दिवसांपासून राज आणि उद्धव हे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, एकत्र येण्याच्या अनेक चर्चा सुरू आहेत, मराठीच्या मुद्यावरून तर दोघेही विजयी मेळाव्यातही एकत्र दिसणार आहेत. मात्र जुन्या जखमा भरणार का? राज ठाकरे त्यांना दिला गेलेला त्रास विसरणार का असा प्रश्न आहे.
