विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्यावरुन कडक कारवाई करण्याचा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे. याप्रकरणी अहवाल आल्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ( Criminal cases will be filed for rioting in the Legislative Assembly premises informed Assembly Speaker Rahul Narvekar.)
थेट विधानसभेच्या लॉबीतच दोन्ही आमदारांचे समर्थक भिडल्याने गोंधळ उडाला होता. अखेर, तेथील सुरक्षा रक्षकांनी पुढे येऊन हा वाद सोडवला, मात्र या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संबंधितांवर कारवाईचा प्रश्न उपस्थित झाला आहे. याप्रकरणी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ह्या गुंडांना पास देणाऱ्यांवरच कारवाई करावी, अशी मागणी केली. मी विधानसभा अध्यक्षांकडे योग्य ती कारवाई करण्याची विनंती केल्याचं मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
विधानभवन परिसरात झालेल्या घटनेनंतर भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी गोपीचंद पडळकरांना बोलावून घेतले होते. येथील सुरक्षा रक्षकांनी दोघांनाही ताब्यात घेतलं आणि दोघांचेही जबाब नोंदवून घेतले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील अणि जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले आणि त्यांना सगळ्या घटनेची माहिती दिली. हे सगळं घडत असताना गोपीचंड पडळकर विधिमंडळात परतले आणि बावनकुळेंना भेटायला गेले. गोपीचंद पडळकर आणि चंद्रशेखऱ बावनकुळे यांची बैठक 10 मिनिटांत संपली आणि पडळकरांनी बाहेर येऊन दिलगिरी व्यक्त केली आणि विधीमंडळातून ते निघून गेले.
विधिमंडळ परिसरात जी घटना घडलेली आहे, ती दुर्दैव आहे. याप्रकरण मी अहवाल मागवला असून उद्या अहवाल मला मिळेल. त्यानुसार मी कारवाई करणार आहे, असे स्पष्ट शब्दात विधानसभा अध्यक्षांनी सांगितले. या हाणामारीच्या घटनेत ज्यांचा सहभाग होता, त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करेल आणि माझ्या अधिकारात सुद्धा जे अधिकार आहेत, त्यानुसार कारवाई करणार आहे. विधिमंडळात अशी हिंसक कृत्य होऊ देणार नाही, यासाठी कारवाई करावी लागेल असे इशारा दिला आहे.
गोपीचंद पडळकर यांनी घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. विधानसभेच्या प्रांगणामध्ये जी घटना घडलेली आहे, ती अत्यंत दुर्दैवी आहे. याचं अतीव दुःख मला आहे, सगळ्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
