राहुल गांधी यांना भोवणार शकुन राणी प्रकरण, निवडणूक आयोगाची नोटीस, पुरावे सादर करण्याचे निर्देश

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना शकुन राणी प्रकरण चांगलेच भोवणार असल्याची चिन्हे आहेत. निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करताना राहुल गांधी यांनी शकुन राणी या महिलेचा संदर्भ दिला होता. त्या शकुन राणीने दोन वेळा मतदान केल्याचा दावा राहुल गांधींनी केला. त्यावर आता निवडणूक आयोगाने राहुल गांधींना नोटीस बजावली आहे. या संबंधी सर्व पुरावे सादर करा असे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ( Rahul Gandhi Faces Trouble Over Shakuntala Rani CaseElection Commission Issues NoticeDirects Submission of Evidence)

कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 7 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. शकुन राणी नावाच्या महिला मतदाराने दोन वेळा मतदान केले. त्यावेळी त्यांनी या संदर्भात काही दस्तऐवज दाखवले होते. पण, चौकशीमध्ये शकुन राणी यांनी हा आरोप फेटाळून लावत, एकदाच मतदान केल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये म्हटले आहे की, प्राथमिक चौकशीमध्ये राहुल गांधींनी दाखवलेला टिक-मार्क असलेला दस्तऐवज अधिकृत मतदान अधिकाऱ्यांनी दिलेला नाही असे आढळले. तसेच राहुल गांधींना संबंधित सर्व मूळ कागदपत्रे आयोगासमोर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पुराव्यांच्या आधारे आयोग प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहे.

भारतीय निवडणूक प्रक्रियेत दुहेरी मतदान हा गंभीर गुन्हा मानला जातो. बिहारमधील मतदार याद्यांच्या संबंधी पुनर्निरीक्षणावर निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे. 1 ऑगस्ट 2025 रोजी ड्राफ्ट मतदार यादी प्रकाशित झाली. 1 सप्टेंबरपर्यंत नागरिकांना नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा अयोग्य नाव वगळण्यासाठी दावे-आक्षेप दाखल करता येणार आहेत. आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने यात बदलासाठी आयोगाशी संपर्क साधलेला नाही असे निवडणूक आयोगाने म्हटले. या प्रकरणावर आता सर्वांचे लक्ष आयोगाच्या चौकशीच्या निष्कर्षाकडे लागले आहे, कारण यातून निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत महत्त्वाचे संकेत मिळू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *