किती खोटं बोलावं यालाही मर्यादा, प्रकाश आंबेडकर यांची शरद पवारांवर टीका

विशेष प्रतिनिधी

मुंबई : राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला. दोघांनी भेटून विधानसभेत १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली होती असे दावा त्यांनी केला. आता नाव आठवत नाही असे ते म्हणाले. यावरून प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला असून किती खोटं बोलावं यालाही एक मर्यादा असते असे ते म्हणाले. ( There is a limit to how much one can liePrakash Ambedkar criticizes Sharad Pawar)

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले, शरद पवारांना दिल्लीत दोन लोक भेटले. त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत १६० जागा जिंकून देण्याची गॅरंटी दिली आणि त्यांची राहुल गांधींशी भेट घडवून आणली. पण शरद पवारांना त्या दोघांची नावे आठवत नाहीत.किती खोटं बोलावं, यालाही एक मर्यादा असते. राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते आहेत त्यांच्या भेटीला कोण येतं-जातं याची नोंद नेहमी घेतली जाते. ज्या दिवशी शरद पवार भेटायला गेले, त्या दिवसाचं रजिस्टर पाहिलं तर त्यांच्या सोबत गेलेले दोन लोक कोण होते हे सहज समजू शकतं. सामान्य माणसाला तुम्ही फसवू शकता, पण राजकीय कार्यकर्त्यांना फसवणं शक्य नाही. जिथे लढायचं तिथे लढायचं नाही, अशी या आघाडीची स्थिती आहे, असेही ॲड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.

शरद पवारांच्या दाव्यावर आंबेडकर म्हणाले, वरातीमागे घोडं… अशी काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची परिस्थिती आहे. ईव्हीएम संदर्भात कोर्टात जाण्यासाठी आपण यापूर्वी सर्व पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यावेळी कोणीही आमच्यासोबत आले नाही. कोर्ट हे एकमेव व्यासपीठ आहे, जिथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होते. आता बोंबलत बसण्याऐवजी त्यावेळीच पाऊल उचलणे गरजेचे होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *