अजितदादांची खरच कोंडी होतेय, अस्वस्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात चर्चा, संशयाची सुई या नेत्याकडे

मुंबई : दोन-तीन दिवस वातावरण तापू दिल्यावर अखेर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र यामुळे अजितदादांची खरेच कोंडी होतेय का अशी चर्चा अस्वस्थ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दबक्या आवाजात सुरू झाली आहे.

पुण्यातील कार्यक्रम अर्धवट सोडून अजित पवार सात एप्रिल रोजी नॉट रिचेबल झाले होते. अजित पवार त्या दिवशी चार्टर्ड फ्लाईटने दिल्लीला गेले होते. या दिवशी पवार यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी भेट झाली होती, अशी चर्चा सुरू झाली होती. याबाबतचा खुलासा अजित पवार यांनी केल्यानंतर पुन्हा न्यू इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्त देऊन एकनाथ शिंदे यांच्या जागी अजित पवार मुख्यमंत्री येणार असल्याचा दावा केला होता. त्यानंतर दोन दिवसांपासून अजित पवार यांच्या नाराजीच्या बातम्या येऊ लागल्या. यामुळे पक्षांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अनेक जणांची संशयाची सुई आहे. पाटील यांच्याशी जवळीक असलेल्या काही पत्रकारांकडून अजित पवार यांच्याबाबत गैरसमज पसरवणाऱ्या बातम्या दिल्या जात असल्याचा आरोप होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या अस्वस्थतेला पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार हेच एकटे जबाबदार असल्याचे चित्र जाणीवपूर्वक तयार केले जात असून त्यांच्या संदर्भातील छोट्या छोट्या गोष्टींनाही अवास्तव प्रसिद्धी दिली जात असल्याची भावना अजित पवार समर्थकांमध्ये तयार झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणताही मोठा नेता यामध्ये तोंड उघडण्यास तयार नसून हे वातावरण निवळण्यासाठी कुणीही प्रयत्न करीत नसल्याने अजित पवार यांना टोकाचा निर्णय घेण्यास भाग पाडण्याचीच ही खेळी असल्याचीही चर्चा आता उघडपणे सुरू झाली आहे.

अजित पवार हे आपल्या समर्थकांसह पक्ष सोडून भाजपला पाठिंबा देणार असल्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू होती. त्यासाठी अनेक बैठका सुरू असल्याचीही माहिती पुढे आली होती. इतकेच नव्हे, तर अजित पवार यांना पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचे सहकार्य व पाठिंबा लाभत असल्याचेही उघडपणे बोलले जात होते. त्यानंतर शरद पवार यांनी स्वतः माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्या भेटीमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थता असून पक्षाचे काही आमदार पक्षाबाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे सांगितल्याचा दावा शिवसेनेच्या वतीने करण्यात आला होता.

या पार्श्वभूमीवर सोमवारी अजित पवार हे पुणे दौऱ्यातील कार्यक्रम रद्द करून मुंबईतच थांबल्याने पुन्हा एकदा ते ‘नॉट रिचेबल’ झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर पवार यांनी खुलासाही केला. रविवारी महाराष्ट्र भूषण कार्यक्रमादरम्यान उष्माघाताचा त्रास होऊ रुग्णालयात दाखल झालेल्यांच्या चौकशीसाठी आपण मुंबईत थांबलो, असे त्यांनी स्पष्ट केले होते. तरीही त्यांच्या वागण्याने तयार झालेले संशयाचे धुके निवळायला तयार नव्हते.

राष्ट्रवादीतील अनेक आमदार व नेत्यांमध्ये सध्या राजकीय परिस्थितीत भाजपला विरोध करावा की, भाजपसोबत जावे याबाबत संभ्रम आहे. काही आमदारांचे मत महाविकास आघाडीचा जनाधार वाढत असल्याने भाजपविरोधातील लढा तीव्र करावा, असे आहे. तर काही आमदार मात्र केंद्रीय यंत्रणांचा ससेमीरा थांबविण्यासाठी भाजपची वाट धरावी, या मताचे आहेत. आमदारांमधील हा संभ्रम दूर करण्याच्या शीर्षस्थ नेतृत्वाच्या प्रयत्नांना फारसे यश मिळताना दिसत नसून, नेतृत्वाने कोणतीही ठोस वैचारिक भूमिका न घेतल्यामुळे या संभ्रमात दररोज भर पडते आहे.

भाजपसोबत जायला हवे, असे मानणाऱ्यांच्या गटात अनेक जुनेजाणते नेते असून त्यात अनेक वर्षे शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू व सत्ता हातात नसतानाही ज्यांना कायम विधान परिषद अथवा राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले नेतेही आहेत, असे समजते. मात्र या सगळ्या बंडामागे एकमेव नेते अजित पवार हेच आहेत असा समज सध्या प्रसार माध्यमांमधून पसरला असून त्याबाबत राष्ट्रवादीचे शीर्षस्थ नेतृत्वही तोंडात मिठाची गुळणी घेऊनच बसले आहे. त्यामुळे अजित पवार व त्यांचे समर्थक अस्वस्थ असून ही सर्व अजित पवार यांची कोंडी करण्याचीच खेळी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादीतील एकही ज्येष्ठ नेता याबाबत प्रसार माध्यमांसमोर येऊन परिस्थितीबाबत कोणताही खुलासा करताना दिसत नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे.