आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये सभा होणार आहे. रत्नागिरीमधील राज ठाकरे यांची ही पहिलीच सभा आहे. त्यामुळे आजच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. कोकणात मनसेची ताकत वाढविण्याच्या दृष्टीने ही सभा महत्त्वाची मानली जात आहे. या सभेच्या निमित्तानं कोकणात मसनेकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. राज ठाकरेंच्या आजच्या या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेकडून टीझर जारी केला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या भाषणाचा रोख कुणाकडे असेल? हे पाहणं महत्वाचे आहे. “सगळेचजण आपापला विचार करतायत, किमान आपण तरी महाराष्ट्राचा विचार करू. असे टीझरमध्ये राज ठाकरेंच्या आवाजात म्हटले आहे. राज ठाकरेंच्या आजच्या या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पहाता या सभेतून राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे समर्थक आमदार आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर मनसेला एखादं मंत्रिपद मिळू शकतं असं कडू यांनी म्हटलं होतं. बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. दुसरीकडे गेल्या काही दिंवसांपासून राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील जवळीक देखील वाढताना दिसत आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यामुळे या सभेत राज ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे आता राज्याचं लक्ष लागलं आहे.
