ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही क्लस्टर योजना राबविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दिवा शहरातील अनधिकृत इमारतींचा शिक्का पुसण्यात येईल. तसेच सुनियोजित शहर म्हणून दिवा शहर विकसित करण्यासाठी ठाण्याप्रमाणेच दिवा शहरातही समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्यात येईल, अशी घोषणा करून यासाठीची प्रक्रिया राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले. तसेच दिवामध्ये स्वतंत्र पोलिस ठाण्याच्या इमारतीसाठी 5 कोटींचा निधी देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या दिवा शहरातील सुमारे 610 कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळाएकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिवा येथे पार पडला. यावेळी यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी दिवा शहरातील धर्मवीर नगर येथे नवीन मुख्य जलवाहिनी लोकार्पण, दिवा आगासन रस्ता येथील आरोग्य केंद्र, दातिवली गावातील व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गावातील शाळा, देसाई खाडी पुल आदी कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.

एकनाथ शिंदे म्हणाले की, दिवा शहराच्या विकासाचा शब्द दिला होता. मोठ्या प्रमाणात निधी देऊन तो शब्द पाळत आहे. यापुढील काळातही दिवा शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल. आतापर्यंत या शहरात पाणीपुरवठ्यासाठी 240 कोटी, दिव्यातील रस्त्यांसाठी 132 कोटी, दिवा-आगासन रस्त्यासाठी 63 कोटी, आगरी कोळी वारकरी भवनसाठी 15 कोटी, देसाई खाडीपूलसाठी 67 कोटी, आगासन येथे 100 खाटांच्या रुग्णालयासाठी 58 कोटी, खिडकारी, दातिवली, देसाई तलावच्या सुशोभिकरणासाठी 22 कोटी व खिडकाळेश्वर मंदिराच्या विकासासाठी 13.5 असे एकूण 610 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. यापुढील काळातही आणखी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात येईल.

“दिवा शहरातील नागरिकांच्या प्रेमाने मी भारावलो आहे. त्यांच्या प्रेमापुढे आतापर्यंत दिलेला निधीही कमी पडेल. दिवा रेल्वे स्थानकाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मा. प्रधानमंत्री व रेल्वे मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. बेतवडे येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील 2800 घरांचा प्रकल्प उभा राहत आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या धर्तीवर राज्यात नमो आवास योजनेतून 10 लाख घरे बांधण्यात येणार आहेत. नागरिकांच्या सुविधांसाठी निधी देण्यात हात आखडता घेणार नाही”, असेही एकनाथ शिंदे यांनी सांगितले.