पेरणीच्या हंगामात अनेकदा शेतकऱ्यांना बोगस बियाणे देऊन त्यांची फसवणूक करण्यात येत असल्याच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बियाणेच्या बाबतीत होणारी फसवणूक थांबवण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकराने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे बोगस बियाणे विकणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा होणार असून, यासाठी येत्या अधिवेशनात कायदा आणला जाणार असल्याची घोषणा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. अकोल्यातील दैनिक लोकमतच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त होत असलेल्या कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलतांना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ही घोषणा केली आहे.
अकोल्यात कृषी विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या धाडसत्रात खाजगी व्यक्ती असल्याचे समोर आल्याने आज अकाेला येथे राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना माध्यमांनी विचारणा केली असता त्यांनी काढता पाय घेतला. तसेच त्यांनी या धाडी मीच टाकण्यास सांगितले असल्याचे स्पष्ट केले.या धाडीत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत काही खासगी व्यक्ती तथा कृषी मंत्री यांच्या जवळचे नागरिक असल्याचा प्रश्न माध्यमांनी सत्तार यांना विचारला असता त्यांनी गवळी हा कृषी अधिकारी असून भट्टड हा माझा पीए नसल्याचे म्हटले. माझा पीए हा कुलकर्णी असून ते मुंबईत आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी एक दिवस बळीराजासाठी आम्ही उपक्रम राबवला. ज्यात राज्यातील 16 हजार शासकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांची अडचण समजून घेतली. सकाळपासून रात्री झोपेपर्यंत शेतकऱ्यांना कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो याचा अभ्यास केला. दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आम्ही खरीप हंगामाची आढावा बैठक आयोजित केली होती. यावेळी अकोला, जालना, परभणी जिल्ह्यातील आमच्याकडे तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांनी 87 ठिकाणी छापेमारी केली, ज्यात 68 ठिकाणी अनियमितता आढळून आली. तर काही ठिकाणी आमचे अधिकारी पैसे घेत असल्याचे बातम्या आल्या. मी पोलिसांना फोन करून कारवाईत सहभागी होण्याच्या सूचना दिल्या. तसेच आमच्या कोणत्याही अधिकाऱ्याने पैसे घेतले असल्याचे आढळून आल्यास त्याची तक्रार जिल्हाधिकारी किंवा एसबीकडे करावी असेही सत्तार म्हणाले.
