आगीत दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोरेगाव उन्नत नगर येथील जय भवानी एसआरए इमारतीतील कुटुबांना आपले संसार सावरण्यासाठी प्रतिकुटुंब ५० हजार रुपये तातडीने वितरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे दिले. त्याचबरोबर या इमारतीचा पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना देतानाच एसआरएच्या इमारतींना संकटकालीन मार्ग म्हणून बाहेरच्या बाजूने लोखंडी जिने बसविण्यासाठी धोरण तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
दुर्घटनाग्रस्त जय भवानी एसआरए इमारतीतील रहिवाशांनी खासदार गजानन किर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त आय. एस चहल, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतिष लोखंडे आदी अधिकारी उपस्थित होते.यावेळी मुख्यमंत्र्यांनी रहिवाशांसोबत संवाद साधत त्यांना दिलासा दिला. दुर्घटनेतील ज्या जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, त्यांची देयके मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून अदा केली जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. या इमारतीचे तातडीने स्ट्रक्चरल आणि फायर ऑडिट करावे. त्यानंतर इमारतीला रंगरंगोटी करावी. इमारतीचा पाणीपुरवठा लवकरात लवकर सुरु होण्यासाठी दुरुस्तीच्या कार्यवाहीला वेग देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
या दुर्घटनेतून सावरण्यासाठी आणि आपला संसार पुन्हा उभा करण्यासाठी रहिवाशांना तातडीची मदत देण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी प्रतिकुटुंब ५० हजार रुपये देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.एसआरएच्या इमारती आहेत त्याठिकाणी संकटकालीन मार्ग म्हणून बाहेरून लोखंडी जिने बसविण्यासाठी धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. रहिवाशांना कपड्यांचे गाठोडी ठेवण्यासाठी स्वतंत्र गोदाम देण्याची व्यवस्था करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यापुढे पार्किंगमध्ये मोकळ्या जागेत गाठोडे ठेवू नका असेही त्यांना सांगण्यात आले.
