विशेष प्रतिनिधी
नागपूर : विधानसभा निवडणूकीत लोकांनी धक्का पुरुषांना मजबूत धक्का देऊन कायमचे घरी बसवले, ज्यावेळी सर्वांनी मला हलक्यात घेतले तेव्हा २०२२ मध्ये मी टांगापलटी केला, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला. (The shockman is home forever, Eknath Shinde’s attack on Uddhav Thackeray)
नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले, शेअर बाजारात ज्या कंपनीची विश्वासार्हता असते त्या कंपनीचे शेअर लोक खरेदी करतात. बाजारात कितीही उलथापालथ झाली तरी ते शेअर खाली-वर होत नाही, अशीच आमची शिवसेना आहे. त्यामुळे या शिवसेनेवर लोक विश्वास ठेवत आहेत. काम करणारी, बाळासाहेब आणि आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे घेऊन जाणारी आणि विकासाला प्राधान्य देणारी आमची शिवसेना आहे. अडीच वर्षे आम्ही एक टीम बनून काम केले. याचा परिपाक या विधानसभेत दिसतो आहे.
मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. पण मी बाळासाहेब आणि दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे, असे लक्षात ठेवावे, असा इशारा देत शिंदे म्हणाले, ज्यावेळी सर्वांनी मला हलक्यात घेतले तेव्हा २०२२ मध्ये मी टांगापलटी केला. सरकार बदलून सामान्य माणसाच्या मनातील सरकार आणले. मी आणि देवेंद्रजी २०० पेक्षा जास्त जागा निवडून आणू असे विधानसभेच्या आधी सांगितले होते. आता आमच्या २३२ जागा आल्या आहेत. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका, हा इशारा ज्यांना समजायचा आहे त्यांनी समजून घ्यावा,” असेही ते म्हणाले.
“माझ्यावर रोज आरोप केले जातात. एका मराठी माणसाने दुसऱ्या मराठी माणसाला महापराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार दिला. याचाही लोकांना मत्सर वाटला. अजून किती ईर्ष्या करणार? ज्या शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री बनवले त्यांचाही अपमान केला. साहित्यिक लोकांना दलाल म्हणाले, महादजी शिंदेंच्या वंशजांचाही अपमान केला. यात त्यांनी अमित शाहंचेही नाव जोडले. कधीतरी सुधारणार आहात की नाही? माझ्यावर कितीही आरोप आणि टीका करा, परंतू, जोपर्यंत महाराष्ट्राची जनता माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला कोणतीही चिंता नाही,” असे सांगत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि एसटीमध्ये महिलांना दिलेली ५० टक्के सवलतही बंद होणार नाही, अशी ग्वाहीदेखील उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
