विशेष प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : संजय राऊतानी कुणा कुणाकडून पैसे घेतले ती यादी आमच्याकडे आहे. गरज पडल्यास बाहेर काढू, असा इशारा समाज कल्याण मंत्री आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी दिला आहे. ( We have the list of people from whom Sanjay Raut taken money, Sanjay Shirsath’s warning )
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्याची पदे मिळायची असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिंदे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात केला होता. यावर शिरसाट म्हणाले, नीलम गोऱ्हे काय बोलल्या हे मला माहित नाही. मात्र मागच्या निवडणुकीच्या वेळेस जे त्यांचे उमेदवार होते त्यांनी आपण पैसे देऊन उमेदवारी घेतली असे जाहीर केले आहे. म्हणून इतर पक्षातील अनेकांना त्यांनी पैसे घेऊन तिकीट दिले आहे. आमच्या मतदार संघात कन्नड, पैठण, सिल्लोड, वैजापूर आणि पश्चिम मतदार संघात देखील पैसे देऊन तिकीट दिले आहे. पहिले कार्यकर्त्यांना तिकीट दिल्या जात होते. मात्र आता पैसे देईल त्याला तिकीट देऊ अशी भूमिका आहे. म्हणून त्यांना जनतेने नाकारले आहे. म्हणून त्यांचे संख्याबळ वीस वर येऊन ठेपले आहे. आम्ही काहीच करत नाही असा आव आणून त्यांनी हुशारकी मारू नये.
संजय राऊत यांनी कुणा कुणाकडून पैसे घेतले याची यादी आमच्याकडे सुद्धा आहे. तिकीट जाहीर करताना गोंधळ संजय राऊत यांनी घातला आहे. गरज पडल्यास त्या लोकांना आम्ही उभे करू, असा इशारा त्यांनी दिला.
उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाचा हिंदुत्वावरून सवाल केले. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना जपणे म्हणजे तुमचे हिंदुत्व आहे का असे विचारले. यावर शिरसाट म्हणाले,
सरकारने कुणाche रक्षण देखील केलं नाही आणि कुणाला पाठिंबा देखील दिला नाही. सरकारने या प्रकरणात कडक भूमिका घेतली असून आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर मोका लावलेला आहे. त्यांना सजा देण्यापर्यंतची सर्व कारवाई केली आहे. कोकणच्या न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर सरकार आपले काम करेल, आम्ही काहीच कारवाई करणार नाही असे कुठलेही वक्तव्य सरकारने केले नाही.
संजय राऊत यांनी सीमा वादावर बैठकीस जाण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाबरतात असे म्हटले होते. त्यावर शिरसाठ म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी सभागृहात भुजबळांच्या समोर सांगितले होते की आम्ही 40 दिवस जेलमध्ये होतो. तरीसुद्धा संजय राऊतला विश्वास नसेल तर त्यांनी ते रेकॉर्ड तपासावं आणि भुजबळ यांना विचारावं. तुम्ही कुठे सीमा भागात गेले तुम्ही काय केलं तुम्ही कुठे दिवे लावले, लोकांची सहानुभूती कशी मिळेल या दृष्टिकोनातून फक्त वक्तव्य करतात, जे काम करतात त्यांना यांनी कधी संरक्षण दिलं नाही आणि विचारपूस पण केली नाही.
