विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अभिमान असलेलं हे सरकार आहे. आम्ही कधीही छत्रपतींच्या वंशजांकडे पुरावे मागितले नाहीत. छत्रपतींचे वारस आहात याचा दाखला मागणाऱ्यांपैकी आम्ही नाहीत, असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत शिवसेना ठाकरे गटावर केला. (We are not the ones asking for evidence from Chhatrapati’s descendants, says Chief Minister Devendra Fadnavis)
उदयनराजे भोसले यांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत असे वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले होते. यावरून मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपण सर्वजण आहोत असं मानणारे आम्ही आहोत. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यामुळे गड किल्ल्यांवरील अतिक्रमण काढण्याच्या कामांची सुरुवात आपण केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेजचं नामांकन झाले पाहिजेत. यासाठी मंत्री आशीष शेलार हे परदेशात प्रेजेंटेशन देखील करून आले आहेत.
काँग्रेसला टोला मारताना फडणवीस म्हणाले, राज्यपालांनी आपल्या अभिभाषणातून राज्याची दिशा मांडली. राज्यपालांनी राज्याच्या विकासावर मार्गदर्शन केलं. पण राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेत काँग्रेसचे नेते नाना पटोले सहभागी नव्हते. राज्यपालांच्या अभिभाषणाच्या चर्चे वेळी नानाभाऊ नेमकं कुठे होते? हे माहिती नाही. काँग्रेसने नाना पटोले यांचं नाव येथेही कापलं का? की नाना पटोले यांचा आवाज काँग्रेस येथेही दाबण्याचा प्रयत्न करत आहे? खरं तर नाना पटोले हे विदर्भाचा बुलंद आवाज आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नानाभाऊ रंगबेरंगी कपडे घालून येत होते. त्यामुळे मला वाटलं की नानाभाऊ दुसऱ्या माहोलमध्ये आहेत. पण आज ते पुन्हा पांढरे कपडे घालून आलेत.
महायुतीवर राज्यातील जनतेने मोठा विश्वास दाखवला, त्यामुळे सरकार अतिशय चांगलं काम करत आहे असे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, महायुती सरकार सत्तेत आल्यापासून आपण १०० दिवसांचं मिशन हातात घेतलं आहे. अगदी तालुक्याच्या पातळीवरील कार्यालय आहेत, त्यांना आपण सात प्रकारच्या गोष्टी सांगितल्या. तेथील कार्यालयातील रेकॉर्ड, लोकांना भेटण्याच्या वेळा यासह वेगवेगळे सात कामे आपण त्यांना दिले आहेत. त्यांना आपण एक टार्गेट दिलं की काय-काय काम करायचं? तसेच १०० दिवसांच्या निकषावर किती काम केली याचा आढावा देखील आम्ही घेत आहोत. यातील अनेक विभागांनी खूप चांगले काम केले आहे.
