विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिशा सालियनची हत्या झाली होती आणि तिच्या वडिलांन आज जी नावे घेतली ती पहिल्या दिवसांपासून सांगत होतो. यामध्ये आदित्य ठाकरेंचा हात आहे असा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केला. ( Disha Salian’s murder, Nitesh Rane said I was saying from day one that Aditya Thackeray was involved)
दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली असं सांगत तिच्या वडिलांनी नव्याने याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाचा पुन्हा तपास व्हावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात नितेश राणे आणि अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे असे दिशाच्या वडिलांनी म्हटलं आहे.
यावर नितेश राणे म्हणाले, यात आदित्य ठाकरेंचा हात असल्याचे मी सांगत होतो. तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंना वाचवण्यासाठी काय काय केलं होतं हे दिशाच्या वडिलांनी याचिकेतून सांगितलं आहे. त्यावेळी आमच्यावर खोटेपणाचा आरोप करणारे आता काय करणार?
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत तत्कालीन व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या मृत्यूप्रकरणी काही माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, असे पत्र मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकाने भाजपचे आमदार नितेश राणे यांना गेल्या वर्षी पाठवले होते.
दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला होता. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते. दिशाच्या आत्महत्येच्या काही दिवसांनी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानेदेखील आत्महत्या केली होती. या दोन्ही आत्महत्या संशयास्पद असल्याचे सांगत नितेश राणेंनी ठाकरे सरकारवर अनेक गंभीर आरोप केले होते.
