विशेष प्रतिनिधी
मुंबई : खुर्चीसाठी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. काँग्रेससोबत जाऊन खुर्ची मिळवली आणि बाळासाहेबांची विचारधारा सोडली. परंतु त्याआधी यांचे प्रमुख उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींकडे गेले होते आणि लोटांगण घालून आले. मला वाचवा, मला वाचवा म्हणाले. मोदींना सांगून आले की, आम्ही महायुती सरकारमध्ये सामील होऊ. मात्र, त्यांचा डाव मी पलटवून टाकला. नोटीस आल्यावर लोटांगण घालायला गेले होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ( Uddhav Thackeray went to Modi and said, “Save me, save me,” Eknath Shinde’s secret revelation)
एकनाथ शिंदे आणखी एक गौप्यस्फोट करताना म्हणाले की, महाविकास आघाडीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना जेलमध्ये टाकण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव होता. औरंग्याचे विचार यांनी घेतले, मात्र मी बाळासाहेबांना सोडलं नाही. त्यामुळे माझ्यासोबत 60 लोकं आले आणि मी हिंदुत्वाचं सरकार आणलं. परंतु तुम्हाला फक्त 20 लोकं निवडून आणता आले. जनतेचा कौलही आमच्याच बाजुने होता. एक अंदर की बात सांगतो, असे म्हणत एकनाथ शिंदे म्हणाले की, अनिल परबही दिल्लीला गेले होते आणि त्यांनी देखील तिथे जाऊन माफी मागितली होती. परंतु राज्यात माघारी आल्यावर त्यांनी पलटी मारली, असे शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले की, “ये शेर का बच्चा है”. 80 जागा लढवल्या आणि 60 जागा जिंकल्या. आम्ही लढून जिंकू किंवा लढून शहीद होऊ. तसेच मला जोपर्यंत कोणी डिवचत नाही तोपर्यंत मी कुणाची कळ काढत नाही. सचिन अहिर तुम्हाला बरंच काही माहिती आहे. मी खुर्चीसाठी काहीच केलं नाही. मी स्वतः नरेंद्र मोदींना आणि अमित शहांना फोन करून सांगितलं होतं, तुम्ही सांगाल तो निर्णय मला मान्य असेल.
