विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपूर हिंसाचारात झालेले नुकसान दंगेखोरांकडून वसूल केले जाईल. त्यांनी पैसे भरले नाहीत तर त्यांची प्रॉपर्टी विकली जाणार आहे. अशा गोष्टी महाराष्ट्रात सहन केल्या जाणार नाहीत. अशा प्रकारेच दंगेखोरांना सरळ केले जाणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. ( The Chief Minister warns that the losses in Nagpur will be recovered by selling the properties of the rioters.)
मुख्यमंत्र्यांनी नागपूर येथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. ते म्हणाले, नागपूरचे पोलीस आयु्क्त आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सर्व गोष्टींसदर्भातील ही आढावा बैठक होती. काही गोष्टी सभागृहात स्पष्ट केल्या होत्या. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर सकाळी जाळण्यात आली, त्यानंतर काही लोकांनी तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. मात्र, प्रतिकात्मक कबर जाळत असताना कुराणच्या आयत लिहिलेली चादर जळाली, अशाप्रकराचा एक भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अपप्रचार केला आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव तयार झाला. या जमावाने तोडफोड केली, गाड्या फोडल्या, लोकांवर हल्ला केला. पोलिसांनी जवळपास ४-५ तासांत या संपूर्ण दंगलीवर आवर घातला. त्याकरता अश्रूधुराच्या नळकांड्या आणि इतर प्रकारच्या प्रतिबंधात्मक पोलिसांनी केल्या.
मुख्यमंत्री म्हणाले, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलवरील चित्रिकरण, पत्रकारांनी केलेले चित्रिकरण यात जे दंगेखोर दिसत आहेत, त्यांच्यावर अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे. १०४ लोकांना ओळखण्यात आले असून ९२ लोकांना अटक केली असून काही अल्पवयीनांवरही कारवाई सुरू आहे
जो जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय, दंगेखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई करण्याची पोलिसांची मानसिकता
आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ही घटना घडावी म्हणून पोस्ट ज्यांनी केलीय त्या सर्वांना दंगेखोरांसोबत सहआरोपी केलं जाणार आहे. जवळपास ६८ पोस्ट आहेत. अजून काही पोस्टची माहिती घेणं चालू आहे.. भडकवणारे पॉस्टकास्ट, चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केलेल्या लोकांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा फडणवीस यांनी दिला.
नागपूरच्या काही भागात लावलेल्या संचारबंदीबाबत फडणवीस म्हणाले “काही निर्बंध घातले आहेत, त्या निर्बंधांमुळे जनजीवनावर परिणाम होतोय, व्यापारावर परिणाम होतोय. त्यात शिथिलता आणावी हा प्रयत्न आहे. पोलीस सजग राहणार आहेत. कोणी दंगा करण्याचा प्रयत्न केला तर अतिशय कडक कारवाई केली जाईल.
