सुरेश धस यांनीच धनंजय मुंडेंना वाचवले, मनोज जरांगे यांचा आरोप

विशेष प्रतिनिधी

जालना : संतोष देशमुख यांचा खून हा धनंजय मुंडे यांच्या सांगण्यावरून झाला आहे. त्यामुळे 302 च्या प्रकरणात धनंजय मुंडे आरोपी होतात. पण, सरकारचे काही प्रतिनिधी संतोष देशमुख प्रकरणात घुसले आणि त्यांनी धनंजय मुंडेंना वाचवले, असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी आमदार सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला आहे. (Suresh Dhas saved Dhananjay Munde alleges Manoj Jarange)

खून खटल्यातील आरोपी मुंडेंच्याच पक्षातील आहेत. ते आरोपी मुंडेंनाच पैसे देत होते, त्यांच्याजवळ रोज असायचे. मुंडेंनी शक्ती दिल्याशिवाय खून करायची धमक कुणामध्ये नाही. तसेच, सरकारचे काही प्रतिनिधी संतोष देशमुखांच्या खून प्रकरणात घुसले आणि त्यांनी धनंजय मुंडेंना वाचवले, असा आरोप जरांगे-पाटील यांनी सुरेश धस यांच्यावर निशाणाकेला.

जरांगे-पाटील म्हणाले, “सत्य कधीच झाकत नाही. तुम्ही किती प्रयत्न केले, तरी नियतीला मान्य नसते. धनंजय मुंडेंची संघटित गुन्हेगारी आहे. खंडण्या वसूल केल्या जायच्या. हा पैसा धनंजय मुंडेंना दिला जायचा. हत्याप्रकरणातील एक नंबरचा आरोपी टोळी तयार करून, अशी कृती करत होता. एक नंबरच्या आरोपीनेच खंडणीसाठी खून करायला लावल्याचे सिद्ध झाले.

माझ्या नादी लागू नका. इथून पुढे माझ्या नादी लागल्यास सोडणार नाही,” असा इशारा देत जरांगे-पाटील म्हणाले, धनंजय मुंडेंनी माझ्या विरोधात मोर्चे काढायला लावले, रस्ता रोको आंदोलन करायला लावले. माझा संबंध नसताना माझ्या फोटोला धनंजय मुंडेंनीच चपला हाणायला लावले. तुम्ही, असे कितीही कृती केली, तर नियतीला मान्य नाही. तुम्हाला याचे फळ मिळाले.