विशेष प्रतिनिधी
चेन्नई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्यावरील टिप्पणीमुळे दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर अटक टाळण्यासाठी स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्याने ट्रान्झिट अॅनिसिपेटरी जामिनासाठी मद्रास उच्च न्यायालयात याचिका केली आहे. अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी ही याचिका दाखल केली आहे. आपले मूळ गाव तामिळनाडूतील असल्याचा आता त्याला साक्षात्कार झाला आहे. (Kunal Kamra moves Madras High Court for interim bail to avoid arrest)
एका स्टँड-अप शोमध्ये कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. कामराने “दिल तो पागल है” या चित्रपटातील गाण्याच्या चालीवर शिंदे यांच्याबाबतचे विडंबन केले. यासाठी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून कुणालला दोनवेळा समन्स पाठविण्यात आले आहे. परंतु, याबाबत त्याच्याकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. त्यामुळे कुणाल कामराला कधीही अटक होण्याची शक्यता आहे.
कामरा तमिळनाडूतील विल्लुपुरमचा कायम रहिवासी असल्याने मद्रास उच्च न्यायालयाचा या प्रकरणावर अधिकार असल्याचा दावा त्याने केला आहे. शुक्रवारी (२८ मार्च) न्या. सुंदर मोहन यांच्या न्यायालयात या प्रकरणाचा तातडीने उल्लेख करण्यात आला.
शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी कामराच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३५३(१)(ब), ३५३(२) (सार्वजनिक उपद्रव) आणि ३५६(२) (मानहानी) अंतर्गत शून्य एफआयआर दाखल केला होता. हा गुन्हा नंतर मुंबईतील खार पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.
कामराने “गद्दार” या शब्दावर आधारित एक विडंबनात्मक गाणे गायले होते. कुठल्याही विशिष्ट व्यक्तीचा उल्लेख नव्हता. मात्र, उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अंगुलीनिर्देश होता. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी या गाण्यावर आक्षेप घेतला. त्यांनी मुंबईतील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये कामराचा शो सुरु असताना तोडफोड केली .
मुंबई पोलिसांनी बोलावूनही कामराने हजर होण्यास नकार दिला, तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याचा दावा करत हजेरीस एक आठवड्याची मुदत मागितली आहे.
