मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर मराठीसाठी आंदोलन थांबविण्याचे राज ठाकरे यांचे मनसैनिकांना आदेश

विशेष प्रतिनिधी

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे परंतु कोणी काही दातात घेतल्यास खडक कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता. यानंतर मराठीच्या वापरासंदर्भात पुरेशी जागृती करण्यात आली असून, तसे घडले नाही तर काय होऊ शकते, याची चुणूक दाखवली आहे. त्यामुळे आता हे आंदोलन थांबवायला हरकत नाही, असे म्हणत आंदोलन थांबवण्याचे आदेश महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिले आहे. ( Raj Thackeray orders Mansainiks to stop agitation for Marathi after CMs warning)

आता मराठी जनतेनेच आग्रह धरायला हवा आणि आपल्या मराठी समाजानेच कच खाल्ली, तर मग ही आंदोलने तरी कशासाठी करायची? असा प्रश्नही राज ठाकरे यांनी केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी मराठी भाषेची राज्यात होणाऱ्या गळचेपीवरून संताप व्यक्त केला होता. महाराष्ट्रात, मुंबईत मराठीचा मान राखला गेलाच पाहिजे, असे ठणकावून सांगितले होते. त्यानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषेच्या वापरासंदर्भात बँकांमध्ये निवेदन देण्यास सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी आज, शनिवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर करत, मनसे कार्यकर्त्यांना हे आंदोलन तूर्तास थांबविण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पत्र शेअर केले आहे. त्यात त्यांनी महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यासाठी आवाज उठवणाऱ्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे कौतुक केल आहे. गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे कार्यकर्त्यांना आदेश दिला होता की, महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार होत आहेत की नाही हे पहा, आणि नसल्यास त्याबद्दलची जाणीव त्या बँकेच्या प्रशासनाला करून द्या. दुसऱ्या दिवशीपासून कार्यकर्ते महाराष्ट्रात सर्वदूर बँकांमध्ये गेले आणि मराठीचा आग्रह धरला. त्यामुळे मराठी भाषा आणि मराठी माणूस यांना कोणी गृहीत धरू शकत नाही, हा संदेश जसा गेला, तसेच सर्वदूर असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक ताकदही दिसली, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मनसेने गेल्या काही दिवसांपासून बँका आणि इतर आस्थापनांविरोधात मराठी भाषेचा आग्रह धरत आंदोलने केली होती. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्यांना मारहाण झाली होती. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठीचा आग्रह धरायलाच हवा पण कोणी कायदा हातात घेतल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.