विशेष प्रतिनिधी
मुंबईः महाराष्ट्रात सायबर गुन्हे रोखण्यासाठी आणि अशा गुन्ह्यातील गुन्हेगारांवर दंडात्मक करवाई करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेतून देशातील पहिल्या महाराष्ट्र सायबर क्राईम सिक्युरीटी कॉर्पोरशनने (एमसीसीएससी) मोठी कामगिरी केली आहे . म्यानमारमध्ये सायबर ठगांच्या गुलामगिरीतून ६० भारतीयांची सुटका महाराष्ट्र सायबर विभागाने केली. ( A major achievement of Maharashtra Cyber Crime Security Corporation envisioned by Chief Minister Devendra Fadnavisthrilling rescue of 60 Indian cyber slaves from Myanmar)
सायबर गुलामगिरी ही आजच्या अत्यंत जटील अशा सायबर गुन्हे विश्वातील भयंकर प्रकार मानला जातो. प्रचंड पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवत सोशल मिडियातून होतकरूंना गळाला लावले जाते. त्यांना विमानाची तिकीटे काढून, त्यांचा व्हिसा काढून विदेशात नेण्यात येते. आणि त्यानंतर त्यांची सुटका होणे कठीण. सायबर ठगांचे गुलाम म्हणून ते सांगतील ते काम त्यांना करावे लागते.
सायबर गुन्ह्यांचे काम करण्यास नकार देणाऱ्या तरुणांचे प्रचंड मानसिक व शारीरिक शोषण केले जात होते. त्यांच्या शरीरातील अवयव काढून विकण्याची धमकी त्यांना दिली जात असे. बाहेर सशत्र बंडखोर तैनात असल्याने कोणालाही पळून जाता येत नव्हते. तसा नुसता प्रयत्न केला तरी भयंकर अत्याचार केले जात. सुटका करण्यासाठी या तरुणांकडून एक वर्षांचे पाच हजार डॉलर्स घेतले जात.
शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत अतिरिक्त पोलीस महासंचालक यशस्वी यादव यांनी महाराष्ट्र सायबर क्राईम सिक्युरीटी कॉर्पोरेशन संदर्भात निरनिराळी माहिती देताना ही भयंकर कहाणी पत्रकारांच्या समोर मांडली. विभागाने केलेली सुटका ही कोणत्याही चित्त थरारक पटकथेपेक्षा कमी नाही.
म्यानमारमधून ६० भारतीयांची सायबर गुलामगिरीतून सुटका करणारे ऑपरेशन तडीस नेताना महाराष्ट्र सायबरने चार भारतीयासह एका विदेशी नागरिकास वेड्या ठोकल्या.काही तरुणांनी पालकांना संपर्क साधल्यानंतरहा प्रकार उघड होत तपास राज्य सायबर सेलकडे आला, त्यांनी केंद्र सरकारला अहवाल देत मदत मागितली. केंद्रानेही थायलंड, म्यानमार सरकारांशी संपर्क साधला आणि या साठ भारतीय सायबर गुलामांची सुटका होवू शकली.
मनिष ग्रे ऊर्फ मंडी, आदित्य रवी चंद्रन, रुपनारायण रामधर गुप्ता, जेन्सी राणी डी आणि तलानिती नुसाक्सी नायजीज अशी त्यांची नावे आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून विदेशात नोकरीचे आमिष दाखवत तरुणांना अर्ज करायला लावले. ही जाहिरात पाहून अनेकांनी अर्ज केले. अर्जदारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. चांगले संभाषण कौशल्य असलेल्या तरुणांची निवड झाली. त्यांचे पासपोर्ट घेण्यात आले. व्हिसा आणि विमान तिकिट दिल्यानंतर या तरुणांना थायलंडला नेण्यात आले. तिथे आधिच पोहोचलेल्या फोटोंवरून या तरूणांना एजंटने बरोबर ओळखले. मग सर्वांना एका अलिशान गाडीत बसवून ७-८ तासांच्या प्रवासानंतर थायलंड म्यानमार सीमेवर नेण्यात आले. तेथून एका छोट्या बोटीतून नदी पार करत म्यानमारमध्ये प्रवेश केला. कडेकोट सुरक्षा असलेल्या एका आवारातील इमारतीत नेण्यात आले. तिथे या सर्व तरुणांची बोगस कंपन्यांसोबतच्या एक वर्षाच्या करारावर स्वाक्षम्या घेण्यात आल्या. आणि तिथून पुढे कुठली नोकरी नव्हे तर सायबरठगांची गुलामगिरी सुरू झाली.
या तरुणांना म्यानमार सीमेवरील या सायबर ठगांच्या छावणीत पोहचवणाऱ्या एजंटांना प्रत्येक तरुणामागे एक हजार अमेरिकन डॉलर्स देण्यात आले.
इथे या तरुणांना मग जगभरातील सामान्य नागरिकांना ऑनलाईन गंडवण्याचे काम सांगितले गेले. महाराष्ट्र सायबर विभाग अत्यंत तडफेने तिथपर्यंत पोहोचला म्हणून या तरुणांची सुटका होवू शकली अन्यथा आजही हे तरूण म्यानमार सीमेवरील छावणीत बसून भारतासह जगभरातील लोकांना ऑनलाईन फसवत राहिले असते. हे काम करण्याशिवाय त्यांच्यासमोर अन्य पर्याय नव्हता. सायबर ठगांनी अशा प्रकारे गुलाम बनवलेल्या तरुणांना लुटले, त्यांच्याकडून सायबर गुन्हे करून घेत लोकांना लूटले.
ही टोळी मलेशिया, थायलंड, म्यानमारसह भारतातील अनेक ठिकाणी बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी पाठविते. तलनिती हा विदेशी नागरिक असून अलीकडेच तो नवीन भरतीसाठी आला आणि पकडला गेला. सायबर ठगांची ही टोळी सध्या पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून सायबर गुलामगिरीवर आणखी प्रकाश पडण्याची शक्यता आहे.
सायबर गुलाम बनवून त्यांच्याकडून लूट करणाऱ्या सायबर ठगांचा शोध घेणे हे एक मोठे आव्हान होते. मात्र महाराष्ट्र सायबरने अत्यंत शिताफीने या ठगांना अटक केली. ही एक सराईत टोळीच असून या टोळीचा म्होरक्या मनिष ग्रे ऊर्फ मंडी आहे. तो अभिनेता असून त्याने काही वेबमालिका आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम केले होते. विदेशात नोकरीसाठी जाहिरात देणे, तरुणांची निवड करणे, त्यांन म्यानमारला पाठविणे ही सर्व जबाबदारी त्याच्यावरच होती. त्याला इतर आरोपी मदत करत होते.
