विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई होणार आहे. ते 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ घेणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुरमु त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. ( Justice Bhushan Gavai to be Chief Justice will take oath on May 14)
भूषण गवई हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे दिवंगत नेते, माजी आमदार, खासदास आणि बिहार, सिक्कीम व केरळ राज्यांचे माजी राज्यपाल रा.सु. गवई यांचे पुत्र आहेत.
न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सर्वोच्च न्यायालयात काही नवीन प्रथा सुरु केल्या. त्यांनी जनहित याचिकांच्या सुनावणीसाठी आठवड्यातून एक दिवस निश्चित केला. सर्वसामान्य लोकांसाठी त्यांनी अनेक आदेश दिले. त्यांनी उत्तर प्रदेशात सुरु झालेले आरोपींच्या घरांवरील बुलडोझर कारवाईच्या विरोधात सरकारचा चांगलेच फटकारले होते.
न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला. कायद्याची पदवी घेतल्यानंतर त्यांनी 1985 मध्ये वकिलीला सुरुवात केली. काही काळ त्यांनी मुंबई आणि अमरावतीमध्ये काम केले. त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दिवंगत राजा एस. भोसले यांच्यासोबत काम केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात ते न्यायाधीश झाले. काही काळानंतर त्यांना बढती मिळाली. ते 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले. आता 14 मे 2025 रोजी ते सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत. त्यांना सरन्यायाधीश म्हणून सहा महिन्यांचा काळ मिळणार आहे. ते 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होतील.
सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश होणारे नागपूर बार असोसिएशनचे ते तिसरे सदस्य आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश झाले आहेत.
