व्हाेट बँक नष्ट होईल म्हणूनच वक्फ कायद्याच्या विराेधात हिंसाचार, याेगी आदित्यनाथ यांचा आराेप

विशेष प्रतिनिधी

लखनाै : वक्फ कायद्याच्या नावाखाली लोकांना भडकवले जात आहे, मुर्शिदाबादमध्ये हिंदूंना घराबाहेर काढून मारण्यात आले. या लोकांना भीती वाटते, की जर गरिबांना उंच इमारती मिळाल्या, तर यांची व्होट बँक नष्ट होईल. म्हणूनच हे लोक हिंसाचार भडकावत आहेत, असा आराेप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. (Violence against Waqf Act is being done so that vote bank should not be destroyed alleges Yogi Adityanath)

केंद्रातील मोदी सरकारने नुकत्याच केलेल्या वक्फ कायद्याच्या मुद्द्यावरून पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे हिंसाचार उसळला आहे. यावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘वक्फ कायद्यावरून हिंसाचार भडकवला जात आहे. मुर्शिदाबादमध्ये तीन हिंदूंची घरातून बाहेर काढून निर्घृण हत्या करण्यात आली. हे लोक कोण आहेत? दलित, वंचित आहेत. त्यांना या जमिनीचा लाभ मिळणार आहे. जर ही जमीन महसूल नोंदींमध्ये परत आली तर गरीबांनाच उंच इमारतीचा फायदा मिळेल. एक चांगला फ्लॅट मिळेल.

विरोधकांवर निशाणा साधताना योगी म्हणाले, या लोकांना भीती वाटते, की जर गरिबांना उंच इमारती मिळाल्या, तर यांची व्होट बँक नष्ट होईल. म्हणूनच हे लोक हिंसाचार भडकावत आहेत. सीएएचा उल्लेख करत योगी म्हणाले, ‘जर जगात कुठेही हिंदूवर अत्याचार झाला तर तो भारतात येईल. मात्र, काँग्रेस-सपा आणि तृणमूल काँग्रेस सारखे पक्ष नेहमीच याला अडथळा निर्माण कत आले. त्यांनी नेहमीच अशा लोकांना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्याचे काम केले. त्यांना निर्वासित म्हणून ठेवण्यात आले होते, मात्र भाजपने त्यांचा स्वीकार केला. याच पद्धतीने हे लोक वक्फ कायद्यावरूनही हिंसाचार करत आहेत.