विशेष प्रतिनिधी
नाशिक : शिवसेना ठाकरे गटातून दररोज गळती चालू आहे. कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरेंबरोबर राहण्याची इच्छा राहिली नाही. नेत्यांनाही या पक्षात भविष्य दिसत नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यासमोर हात टेकले आहेत. त्यामुळे आता नाशिकच्या अधिवेशनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजात शिल्लक राहिलेल्या कार्यकर्त्यांना साद घातली जाणार आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंना दणका देत वेगळा गट तयार केला. लोकप्रतिनिधींचे मोठे बळ असल्याने शिंदे यांच्या पक्षालाच निवडणूक आयोगाने मान्यता दिली. त्यावर पक्षपाताचा आरोप करत त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणत होते की जनतेच्या न्यायालयात जाऊ. तेथे आम्हाला न्याय मिळेल. मात्र विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचा दारुण पराभव करून जनतेच्या न्यायालयानेही त्यांना नाकारले. त्यामुळे आता उद्धव यांच्यावर कार्यकर्त्यांचा विश्वास राहिलेला नाही.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून गळती रोखण्यासाठी काय करावे , या विचारात असणाऱ्या उबाठा शिवसेनेच्या नेत्यांनी उद्या 16 एप्रिल 2025 रोजी नाशिक मध्ये बाळासाहेबांचेआत्तापर्यंत न ऐकलेले भाषण वाजविणार असल्याचा गाजावाजा केला. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे नाशिक मध्ये येऊन शिवसेनेच्या उत्तर भारतीय विभागीय मेळाव्यात भाषण करणार त्यापेक्षा बाळासाहेबांचे आत्तापर्यंत न ऐकलेले भाषण ऐकायला मिळणार. त्या भाषणात नेमके काय असणार?, याविषयी चर्चा सुरू झाली.
पण प्रत्यक्षा त्यांना ऐकलेल्या भाषणाचा फुसका बार निघाला आहे. कारण बाळासाहेबांचे “न ऐकलेले भाषण” असा जो गाजावाजा करण्यात आला, तो प्रत्यक्षात बाळासाहेबांचा आवाज AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मार्फत काढून बाळासाहेबांचे भाषण ऐकविण्याचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे . या भाषणातून बाळासाहेब त्यांच्या हयातीनंतरच्या नव्या परिस्थिती विषयी भाष्य करून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गळती रोखायचा प्रयत्न करणार आहेत.
कारण बाळासाहेबांच्या AI भाषणातून स्वतः बाळासाहेब बोलणार नाहीत, तर उद्धव ठाकरेंना जे हवे, तेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाळासाहेबांच्या तोंडून बोलवून घेणार हे उघड झाले.
२०१२ साली बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतील शेवटच्या मेळाव्यात बाळासाहेब प्रत्यक्ष हजर राहू शकले नव्हते. यावेळी त्यांच्या भाषणाची चित्रफीत
दाखविण्यात आली होती. या चित्रफितीमध्ये उद्धव आणि आदित्य यांना सांभाळून घ्या असे भावनिक आवाहन त्यांनी केले होते. तेरा वर्षांत पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. शिवसेना पक्षच उद्धव ठाकरेंच्या हातातून गेला आहे. पक्षात कार्यकर्ते आणि नेते राहिलेले नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा बाळासाहेबांचा आधार घेण्याची वेळ उद्धव ठाकरे यांच्यावर आली आहे.
