महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्राला डॉलर अर्थव्यवस्था होण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे हे ध्येय महाराष्ट्र प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीने मुदतीपूर्वीच साध्य करु शकते. त्याकरता सगळ्याच क्षेत्रात आपल्या उत्कृष्टता आणावी लागेल. सगळ्या क्षेत्रात चांगले काम करत रहावे लागेल, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ( No one can stop Maharashtra from becoming a trillion dollar economybelieves the Chief Minister)

राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील सन २०२३-२४ तसेच सन २०२४-२५ या वर्षातील पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र आता थांबणार नाही. तो कधी थांबला नव्हताच. पण कोणी प्रयत्न केला तरी थांबणार नाही. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. आपण हाफ ट्रिलियन डॉलर्सचे उद्दिष्ट गाठले आहे. बाकीचे आपल्या खूप मागे आहेत. पण ससा आणि कासवाची जशी शर्यत आहे तशी होऊ नये. आपण कोठेतरी झोपलो आणि कासव पुढे गेले असे होऊ नये. आपण काहीही केले नाही तरी 2031 किंवा 2032 साली आपण एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होणारच आहोत. पण आपल्याला संधी आहे की 2029 किंवा 2030 साली सुद्धा आपण ही उदिष्ट गाठू शकतो आणि देशांतर्गत पहिली एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी होण्याचा man मिळवू शकतो. त्याकरता सगळ्याच क्षेत्रात आपल्या उत्कृष्टता आणावी लागेल. सगळ्या क्षेत्रात चांगले काम करत रहावे लागेल.

प्रशासनिक सेवेत महाराष्ट्र अग्रणी राज्य असून त्याचा आदर्श देशभरात घेतला जातो, या पार्श्वभूमीवर प्रशासनातील यशस्वी गोष्टींचे प्रमाणीकरण होणे आवश्यक आहे. जेणेकरुन अधिकाऱ्यांच्या कल्पकतेतून यशस्वी केलेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा व्यापक उपयोग होईल, त्यादृष्टीने सर्व विभागांनी टास्क फोर्स निर्माण केला पाहिजे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राला शिवकालीन काळापासून प्रशासकीय कार्यपद्धतीचा उत्कृष्ट वारसा लाभलेला असून येत्या दहा पंधरा वर्षात राज्याला जागतिक स्तरावर अनेकविध संधी उपलब्ध होणार आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेत देशाचे मजबूत स्थान निर्माण होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राला महत्वपूर्ण कामगिरी करणे गरजेचे आहे, महाराष्ट्राच्या सक्रिय सहभागातून देशाचे ध्येय साध्य होण्यास मोठे सहाय्य मिळते. यासर्वांत प्रशासकीय अधिका-यांचे योगदान, गतिमानता, पारदर्शक लोकाभिमुख कार्यपद्धतीचा स्विकार निश्चितचं महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. राज्य शासनाने राबवलेल्या शंभर दिवसाच्या संकल्पनेची यशस्वी अंमलबजावणी सर्व विभागांनी केली आहे. या संकल्पनेच्या यशाचे श्रेय हे प्रशासनिक अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचे असून काम पारदर्शक आणि गतीमानतेने यशस्वी होते याची अनेक उदाहरणे आहेत.

 

विशेष म्हणजे लोकसेवेच्या भावनेतून केलेल्या कामाचे समाधान हे अधिका-यांनाही वेगळा आनंद देऊन जाते. अनेक ठिकाणी जेव्हा लोक वीस तीस वर्षांपूर्वी केलेल्या एखाद्या अधिका-याच्या कामाचा दाखला देतात तेव्हा आपल्या कामातून मिळविलेली ही ओळख मोठी गोष्ट असते. चांगल्या भावनेतून केलेले काम हे यशस्वी होतेच. त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळतात .तंत्रज्ञानाचा व्यापक स्विकार आणि वापर हा गरजेचा आहे.अनेक विभागांच्या चांगल्या कल्पनांचे,निर्णयाचे प्रमाणिकरण व्हायला पाहिजे, जेणेकरुन व्यापक स्तरावर त्या कामांचा लाभ इतरांनाही होईल, असे त्यांनी सांगितले.

प्रशासनात लोकाभिमुख दृष्टिकोन, पारदर्शक कारभार आणि गतिशील कार्यपद्धती महत्वाची आहे. यामुळे लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणता येतो. लोकांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी अधिका-यांची असते. लोकसेवेचा भाव मनात असेल तर ही जबाबदारी यशस्वी होते. अशा चांगल्या कार्याला पुरस्कार मिळणे, त्यातून इतरांना प्रेरणा मिळणे यादृ्ष्टीने पुरस्कार आणि त्यातुन मिळणारे प्रोत्साहन निश्चितच प्रेरणादायी आहे. ही ऊर्जा भविष्यातील कार्यासाठी देखील मार्गदर्शक ठरणार आहे.