सरपंच संतोष देशमुख यांच्या कन्या वैभवी देशमुखचे बारावीला ८५.३३% गुणांसह घवघवीत यश

पुणे : पित्याचा निर्घृण खून, संपूर्ण राज्यभरात आंदोलन, आणि तरीही जिद्द आणि अभ्यासावर विश्वास ठेवून वैभवी देशमुख हिने आपल्या बारावीच्या परीक्षेत ८५.३३% गुण मिळवत संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे.
पीसीएमबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र) या शाखेत तिने ९१.५% गुण मिळवले आहेत.
( Sarpanch Santosh Deshmukh’s daughter Vaibhavi Deshmukh achieved a remarkable success in 12th with 85.33% marks.)

विषयवार गुण:
भौतिकशास्त्र: ८३
गणित: ९४
जीवशास्त्र: ९८
इंग्रजी: ६३
मराठी: ८३

वैभवीच्या वडिलांचा संतोष देशमुख यांचा, ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला होता. त्यांनी स्थानिक पवनऊर्जा प्रकल्पातील कथित खंडणीप्रकरणाचा विरोध केला होता, त्यामुळे त्यांना जीवे मारल्याचा आरोप आहे.

वडिलांच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन महिन्यांत वैभवीने बारावीची परीक्षा दिली. निकालाच्या दिवशी तिने वडिलांच्या फोटोसमोर दिवा लावून त्यांना अभिवादन केले.

वैभवी भावुक होत म्हणाली, “बाबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतेय. त्यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर आहेत. पण आज त्यांच्या अनुपस्थितीत या यशाचा आनंद अपूर्ण वाटतो.”

संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर बीड जिल्ह्यासह राज्यभरात तीव्र आंदोलन झाले. आरोपींना सुरुवातीला अटक झाली नाही, मात्र वैभवीने आपल्या कुटुंबास, काका धनंजय देशमुख, धाकटा भाऊ आणि दुःखात सैरभैर झालेली आई यांच्यासोबत खंबीरपणे न्यायासाठी आंदोलन सुरूच ठेवले.
परीक्षेच्या काळातही वैभवी आपल्या लढ्यात ठाम होती. ग्रामस्थांनी वैभवीच्या यशाबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.