विशेष प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल हा ९१.८८ टक्के लागला आहे. यावर्षी कोकण विभागाचा सर्वाधिक ९६.७४ टक्के निकाल लागला आहे. सर्वात कमी निकाल लातूर विभागाचा असून, ही टक्केवारी ८९.४६ इतकी आहे. यंदा देखील मुलींनीच बाजी मारली असून, मुलींच्या उत्तीर्णची टक्केवारी मुलांच्या तुलनेत ५.७ टक्के अधिक आहे. ( Class 12th result 91.88 percent: Konkan region tops girls prevail)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी पत्रकार परिषदेत माहिती देताना म्हणाले, यंदाच्या वषी बारावी परीक्षेचा निकाल गेल्या वषी पेक्षा १.४९ टक्क्यांनी कमी आहे. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल हा ९३.३७ टक्के होती.
यावर्षी परीक्षेसाठी राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून, विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून, त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३६,१३३ एवढी असून, त्यापैकी ३५,६९७ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,८९२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८३.७३ आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८% असून, मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१% आहे. राज्यात एकूण इयत्ता बारावीच्या १५४ विषयांसाठी परीक्षा घेण्यात आली. यापैकी ३७ विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.
पुनर्परिक्षार्थी उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ टक्के
राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४२,३८८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४२,०२४ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १५,८२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३७.६५ आहे.
दिव्यांग उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ टक्के
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७,३१० दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ७,२५८ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६,७०५ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.३८ आहे. दरम्यान इयत्ता १२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देण्यात आलेले आहेत.
विभागनिहाय बारावीचा निकाल
पुणे : ९१.३२ टक्के
कोकण : ९६.७४ टक्के
कोल्हापूर : ९३.६४ टक्के
अमरावती : ९१.४३ टक्के
छत्रपती संभाजीनगर : ९२.२४ टक्के
नाशिक : ९१.३१ टक्के
लातूर : ८९.४६ टक्के
नागपूर : ९०.५२ टक्के
मुंबई : ९२.९३ टक्के
