आधी हक्कभंगाची पर्वा नसल्याच्या वल्गना, निलंबनाच्या भीतीने भास्कर जाधवांचा माफीनामा

विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विरोधकांच्या हक्काचेही संरक्षण करायचे असते, मात्र ते सरकार वाचवण्यासाठी कायम प्रयत्न करत असतात. नार्वेकर दुतोंडी अध्यक्ष आणि स्वतःला सरकार समजत आहेत. या वक्तव्यावरून हक्कभंग येणार असेल तरी हरकत नाही असे म्हणणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी निलंबनाच्या भीतीने माफीनामा दिला आहे. ( Bhaskar Jadhavs apology for fear of suspension accusations of not caring about violation of rights)

मी तसे बोलायला नको होते. मी या ठिकाणी सभागृह जेव्हा नियमाने चालावे असा आग्रह धरतो, भांडण करतो, तेव्हा माझ्याकडून अशी चूक होता कामा नये असे मला वाटते, असे सांगत त्यांनी विधानसभेत माफी मागितली. गुरुवारी (17 जुलै) विधानसभेत राईट टू रिप्लायवरून विरोधकांनी अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. एवढेच नव्हे तर सभागृहाच्या बाहेर पत्रकारांशी बोलतानाही शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी (18 जुलै) विधानसभेत मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी, ‘भास्कर जाधव यांनी माफी मागावी नाहीतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी,’ अशी मागणी अध्यक्षांकडे मागणी केली. यावरून स्वतः भास्कर जाधव यांनी मागितली आहे.

शिवसेना उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले की, “मी सभागृहाला आणि आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो. मला माफी मागितली पाहिजे हे नमूद करतो. काल उपमुख्यमंत्र्यांनी भाषण केले. मी येथे शांतपणे बसून ऐकत होतो. पण, गेल्या 4 ते 5 वर्षांपासून मी तसे करत नाही. मी सभागृहाच्या कामकाजाविषयी आणि नियमांविषयी आग्रही असतो. आपण पाहिले असेल की, मी सभागृहात आकांडतांडव करत नाही. कोणावर ओरडतही नाही. पण मी सभागृहात एक शब्दही बोलला तरी सत्ताधारी बाकावरून कदाचित जाणिवपूर्वक माझ्या बोलण्यात अडथळे निर्माण केले जातात.” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

पुढे भास्कर जाधव म्हणाले की, “मला काहीही बोलायचे म्हटले तरीही इतक्या कमेंट्स होतात की, त्याला काही मर्यादा असली पाहिजे. आता मी कबूल करतो, माझ्या इतक्या वर्षात एकदाही माझ्याकडून असंसदीय शब्द गेला नाही. सभागृहात केव्हाही माझ्यावर माफी मागण्याची वेळ आली नाही. पण इथे मी माफी मागावी किंवा न मागावी हे मला सांगा. पण मी बाहेर जे बोललो ते मी घरी जाऊन पाहिले त्याचा खेद मला सुद्धा वाटला. मी तसे बोलायला नको होते. मी या ठिकाणी सभागृह जेव्हा नियमाने चालावे असा आग्रह धरतो, भांडण करतो, तेव्हा माझ्याकडून अशी चूक होता कामा नये असे मला वाटते.” असे त्यांनी यावेळी स्पष्ट करत सभागृहाची माफी मागितली.

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “काल सभागृहात राईट टू रिप्लायच्या मुद्यावर झालेल्या गदारोळानंतर विरोधकांनी सभागृहाबाहेर जाऊन पत्रकारांशी अध्यक्षांविरोधात अश्लील हातवारे करत टीका केली. यासंबंधीचे काही गंभीर व्हिडिओ आम्ही पाहिले. त्यात थेट अध्यक्षांवर आरोप होताना दिसून येत आहेत. अशा प्रवृत्तीकडे दुर्लक्ष केले तर ही प्रवृत्ती बोकाळेल. त्यानंतर यासंबंधी कोणतीही परंपरा, प्रथा, नियम, आदर राहणार नाही. या प्रकरणी संबंधितांनी माफी मागावी किंवा त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करावी,” असे ते म्हणाले. यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, “मंत्री शंभूराज देसाई यांनी मांडलेल्या मुद्यावर मला बोलायचे नव्हते. पण सभागृहाच्या आत व सभागृहाच्या बाहेर सदस्यांचे आचरण कसे असावे यासंदर्भात मी सांगायचे गरज नाही. इथे आलेला प्रत्येक लोकप्रतिनिधी आपल्या मतदारसंघातील लाखो लोकांचे प्रतिनिधित्व करत असतो. त्यामुळे केवळ सभागृहाबद्दलच त्यांची जबाबदारी नव्हे तर आपल्या मतदारसंघाप्रती असणारी जबाबदारी लक्षात घेऊन यापुढे आपली वर्तणूक ठेवावी.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *