विशेष प्रतिनिधी
मुंबई : ठाकरे ब्रँड जिवंत असला तरी तो बाजारात चालत नाही. बाजारात अनेक ब्रँड असतात, प्रत्येक ब्रँड बाजारात चालतो असे नाही. सध्या हा ब्रँड बाजारात जनतेस पसंत नाही. मतदारांना आवडत नाही असा निशाणा माजी मंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज आणि उद्धव ठाकरे बंधूवर साधला आहे. ( Thackeray brand is not working in the market at present voters do not like it Sudhir Mungantiwars target)
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ब्रँड ठाकरे अशी मुलाखत घेतली. त्यावरून सुधीर मुनगंटीवार म्हणाले, उद्धव ठाकरे स्वत:ला सामान्य समजत असतील, कारण ते चिंताग्रस्त झाले आहेत . बाकी सर्वसामान्य जनता जे मतदार आहेत ते आमच्यासोबत आहे. मतदानातून ईव्हीएम बटण दाबून त्यांनी त्यांचा पाठिंबा आम्हाला आहे. राजकारणाचा स्तर इतका खाली गेलाय की जादूटोणा वैगेरे भाषा केली जाते. जादूटोणा करून इतक्या जागा मिळाल्या असत्या तर आपल्या देशातील गरिबी हटवता आली असती, देशातला जातीयवाद हटवता आला असता. जादूटोणा जगात नाही. जादूटोणा असता तर आपल्याला गुलामगिरीत राहावे लागले नसते. ती कपोलकल्पित कथा आहे.
मुनगंटीवार म्हणाले, मराठीचा मुद्दा घेऊन सरकारवर आक्रमक होण्याची आवश्यकता नाही. याच सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला काँग्रेसने दिला नाही. १९५६ मध्ये कर्नाटक सीमेत मराठी भाषिकांना बळजबरीने घालण्याचं काम काँग्रेसने केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांना समजवण्याचा प्रयत्न झाला. कारवार, निपाणी कर्नाटकला देऊ नका मात्र नेहरूंनी ऐकले नाही. कन्नड भाषिक आपल्या मराठी भाषिकांवर तिथली भाषा संपवावी म्हणून प्रयत्न करतायेत. उदय सामंत मराठी भाषा विभागाचे मंत्री आहेत तिथे भाषेच्या संवर्धनासाठी जेवढा निधी लागेल तेवढा महाराष्ट्र सरकार देईल असं त्यांनी सांगितले. त्याचा अर्थ मराठी भाषा, मराठी भाषिक यांच्याबाबत राज्य सरकार गंभीर आहे. राज ठाकरे यांच्या सूचनांचे स्वागत आहे. या राज्यात कुणीही असो त्याने हृदयात मराठीचे प्रेम ठेवूनच पुढे जायचे आहे.
